नरेंद्र मोदी चांगली स्वप्ने विकू शकतात, राहुल गांधी कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, काँग्रेसला जळी-स्थळी मोदी दिसतात, अजितदादांना निर्णय घेताना कोणाच्या परवानगीची गरज नसते, ‘आप’ च्या दणक्याने काँग्रेस खडबडून जागी झाली, अण्णांकडे मनाचा मोठेपणा नाही, राजकारणी भुतापेक्षा मताला घाबरतात, यासारखी विधाने करताना एकमेकांना कोंडीत पकडण्याची प्रवक्तयांची चढाओढ, शेरेबाजी, टोलवाटोलवी आणि संवादकाने घेतलेली सर्वाचीच फिरकी यामुळे चिंचवडचे चर्चासत्र चांगलेच रंगले.
मैत्री प्रतिष्ठान आयोजित ‘भारतीय राजकारण व आजचा तरुण’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. नीलम गोऱ्हे, सचिन सावंत, विद्या चव्हाण, अतुल भातखळकर, विश्वंभर चौधरी व प्रज्ञा शिदोरे सहभागी होते. ‘एबीपी माझा’ चे प्रसन्न जोशी यांनी सूत्रसंचालन केले. चर्चासत्रात अण्णांचे आंदोलन, नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यातील स्पर्धा, चार राज्यातील निवडणुकांनंतरची परिस्थिती, शरद पवार यांचे राजकारण, अजितदादांची क्षमता, उद्धव व राज, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यासह राजकारणातील घराणेशाही असलेली जिल्हानिहाय घराणी, अरविंद केजरीवाल व ‘आप’चा प्रभाव, साधेपणाची महती, सत्तेचे विकेंद्रीकरण, व्यवस्थेतील दोष, तरुणाईची ताकद, त्यांच्या अपेक्षा व प्रत्यक्षातील वास्तव अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. तरुणाईच्या प्रश्नांवर अधिक चर्चा होणे अपेक्षित असताना वाहिन्यांवरील चर्चेप्रमाणेच याही ठिकाणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे काम प्रवक्तयांनी केले व संधी मिळेल तेथे संवादकाने प्रवक्तयांची फिरकी घेतली.
आदर्श अहवालासंदर्भात राहुल गांधींच्या विधानावरून चर्चेला सुरुवात झाली. हे उशिरा सुचलेले शहाणपण असून त्यांनी राजकीय सोय पाहिल्याची टीका भातखळकर यांनी केली, तर गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आमची चूक झाल्याचे मान्य करावे. राहुल गांधी कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, असे भाकीत करत चौधरींनी मोदी तरुणांना चांगल्या प्रकारे स्वप्न विकू शकतात, असे विधान केले. राजकारणी भुतापेक्षा मताला घाबरतात, हे लक्षात ठेवून तरुणांनी स्वत:चा अजेंडा राबवा, असे ते म्हणाले. राहुल आणि मोदी यांच्यात स्पर्धाच होऊ शकत नसल्याचे सांगत काँग्रेस नेत्यांना जळी-स्थळी मोदीच दिसू लागले आहेत, असे भातखळकर म्हणाले. अजितदादांना कोणाला विचारून काम करण्याची गरज नाही, असे विधान विद्या चव्हाण यांनी केले. अण्णा हजारेंनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा, असे मत त्यांनी केजरीवालांचा मुद्दा मांडताना सांगितला. महिलांना सुरक्षा, शिक्षण, रोजगाराची हमी हवी, अशी अपेक्षा शिदोरे यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2013 रोजी प्रकाशित
नरेंद्र मोदी स्वप्ने चांगली विकू शकतात.. राहुल गांधी कधी पंतप्रधान होणार नाही!
राजकारणी भुतापेक्षा मताला घाबरतात, हे लक्षात ठेवून तरुणांनी स्वत:चा अजेंडा राबवा, तर अजितदादांना निर्णय घेताना कोणाच्या परवानगीची गरज नसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-12-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian politics youth aap debate abp maza