पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत शनिवारी (२५ मार्च) संपणार आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५३ हजार ६७२ अर्ज दाखल झाले आहेत. आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे काही पालकांना अर्ज करता न आल्याने, कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने अर्ज करता आला नाही. त्यामुळे पालक आणि संघटनांच्या मागणीमुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्जांसाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. हेही वाचा - पुणे : जुन्या योजनांना नव्याने मुलामा; समान पाणीपुरवठा, नदीसुधार योजना, जायका प्रकल्प पूर्ण करण्यावर भर हेही वाचा - अभियोग्यता चाचणीचा निकाल जाहीर, परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ ‘हँग’ यंदा प्रवेश प्रक्रियेत ८ हजार ८२८ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागा उपलब्ध आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अर्जांची संख्या ७० हजारांनी वाढली आहे. अर्जांसाठी शनिवार शेवटचा दिवस असल्याने अर्जसंख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रकियेची माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.