केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांच्या साधेपणाचे कवतिक झाल्यानंतर प्रत्यक्षात ही अशी साधी राहणी बहुतेकांसाठी गैरसोयीची ठरू लागल्याचे लक्षात येत आहे. साधेपणा टिकवून ठेवण्यातच अरविंद केजरीवाल यांची शक्ती वाया जाण्याची भीती आहे. साध्या राहणीचा अट्टहास धरताना वस्तुत: ‘गरज की चैन’ यातील फरक ओळखण्याची आवश्यकता आहे.
भाजप व काँग्रेसला कंटाळलेला मतदार, सोशल नेटवर्किंग साइट्सवर अनामिक राहून व्यवस्थेविरुद्ध राग व्यक्त करणारा नवमतदार व अरविंद केजरीवाल यांच्या साधेपणाला ‘ग्लॅमर’ मिळवून देणारी प्रसारमाध्यमे, यातच आम आदमी पक्षाचे यश सामावले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत त्यांचे आराध्य अण्णा हजारे यांच्या उपोषणाचे ‘जंतरमंतर’ प्रसारमाध्यमांच्या डोक्यावरून लवकर उतरले. केजरीवाल अण्णांच्या तुलनेत नशीबवान आहेत, कारण व्यवस्थेला आव्हान देणारे सारेच प्रसारमाध्यमांच्या गळ्यातले ताईत बनतात. अशा आव्हान देणाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला ‘न्यूज व्हॅल्यू’ असते. त्यातूनच मग केजरीवाल यांनी बंगला नाकारला; लाल दिव्याची गाडी नाकारली; सुरक्षा व्यवस्था नाकारली; सरकारी सोयीसुविधा नाकारल्या, अशा बातम्यांचा रतीब घातला जातो. आपल्याला साऱ्या भौतिक सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, असे मनोमन वाटणारे आपले भंपक समाजमन केजरीवाल यांच्या ‘ग्लॅमरस’ साधेपणामुळे सुखावते, तर केजरीवाल म्हणजे आधुनिक गांधी असल्याचा साक्षात्कार त्यांच्या अनुयायांना होतो. अशा परिस्थितीत ‘ग्लॅमरस’ साधेपणा व स्वभावातला साधेपणा अशी तुलना करण्याची गरज निर्माण होते. साधेपणाची नवी व्याख्या करावी लागते. ‘गरज व चैन’ यातील सूक्ष्म फरक नव्याने मांडावा लागतो, तरच सवंग प्रसिद्धीसाठी साधेपणा मिरवणारे व साधेपणाने जगणारे, असा भेद सर्वसामान्यांना ओळखता येऊ शकेल.
सध्या फेसबुकवर केजरीवाल यांच्या साधेपणाचे पेव फुटले आहे. त्यांच्या साधेपणाला ‘ग्लॅमर’ मिळाल्याने भाजप समर्थकांना पोटशूळ उठला. त्यातून सुरू झाली गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर व अरविंद केजरीवाल यांच्या साधेपणाची निर्थक तुलना. पर्रिकरांचा साधेपणा ‘सुशेगाद’ गोव्यात उठून दिसतो. ज्यांना पर्यटनापलीकडचा गोवा व राजकारणापलीकडची दिल्ली माहिती आहे, त्यांना पर्रिकर व केजरीवाल यांची तुलना किती विसंगत आहे, हे समजू शकेल. गोव्याची लोकसंख्या १४ लाख, तर दिल्लीची लोकसंख्या एक कोटी ६७ लाख, याच आकडेवारीत सर्व आले. बरं साधेपणासाठी उदाहरण ते काय, तर पर्रिकर हातात पिशव्या घेऊन बाजारात मासळी घ्यायला जातात. हे केवळ गोव्यातच शक्य आहे. दिल्लीत नाही. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून दिवसभर त्यांच्या घरासमोर माणसांची इतकी गर्दी असते, की त्यांना स्वत:च्या घराचा उंबरा ओलांडताना नाकी नऊ येतात.
केजरीवाल यांच्या शपथविधीच्या दिवशी रामलीला मैदानानजीक असलेल्या नवी दिल्ली मेट्रो स्टेशनवर तुफान गर्दी उसळली होती. मेट्रोने प्रवास करून नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाठण्यासाठी निघालेल्या हजारो प्रवाशांची त्या दिवशी गैरसोय झाली. शपथविधी सोहळा संपल्यानंतर नवी दिल्ली मेट्रो स्टेशन बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. तेव्हा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या ‘आम आदमी’ला शांत करण्यासाठी प्रा. योगेंद्र यादव यांना रौद्र रूप धारण करावे लागले. रामलीला मैदानाभोवती कागद, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा खच पडला होता. शपथविधी झाल्यानंतर व्यासपीठाच्या मागे अधिकारी व नूतन मंत्र्यांसाठी असलेल्या छोटेखानी मंडपात अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु गर्दीवर नियंत्रण नसल्याने शेकडो ‘आम आदमी’ या मंडपात शिरले. पुढे काय झाले असेल, ते सुज्ञांस सांगणे न लगे. सुरक्षा अधिकारी हे हताशपणे पाहत होते; तर मनीष सिसोदिया यांच्या शाळकरी मुलास वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तुम्हालादेखील राजकारणात जायचे आहे का, असे प्रश्न विचारत होते.
सरकारी निवासस्थानात न जाता कौशांबीमधील घरीच राहण्याचा निर्णय केजरीवाल यांच्यावर प्रसारमाध्यमांनी व भंपक समाजाने लादला आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबीमधून मध्य दिल्लीत सायंकाळी सात वाजता बैठकीसाठी पोहोचायचे असेल, तर दुपारी चार वाजता घरातून निघावे लागेल, कारण सायंकाळी या भागात वाहतुकीची अक्षरश: कोंडी होते. त्यात मेट्रोसाठी खोदकाम सुरू असेल तर विचारूच नका. नोकरी करणाऱ्या कुणाही ‘आम आदमी’ला आपले घर कार्यालयानजीक असावे असेच वाटते, कारण त्याला वेळ वाचवायचा असतो. त्यामुळे ज्या २८ टक्के मतदारांनी ‘आप’ला मत दिले, किमान त्यांच्या वेळेचा विचार तरी अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांच्या दबावापोटी सरकारी घर नाकारताना करायला हवा होता. गणवेशातील सुरक्षारक्षक नाकारल्याने केजरीवाल यांच्याभोवती साध्या वेशातील शंभरेक सुरक्षारक्षकांचा गराडा असतो. आता तर ‘आप’च्या कार्यालयावर हल्ला झाल्याने केजरीवाल यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावर वर्षांला सव्वा कोटी रुपये खर्च होतील. शिवाय २८ सुरक्षारक्षक अहोरात्र केजरीवाल यांच्या सभोवती राहतील.
सर्व स्तरांतील नागरिक केजरीवाल यांना भेटायला येतात. केजरीवाल यांच्या शेजाऱ्यांनाही या गर्दीचा त्रास व्हायला लागला आहे. त्यांच्या संख्येवर कुणाचेही नियंत्रण नाही. प्रसाधनगृहांची कमतरता ही वेगळीच समस्या. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या गिरिनार अपार्टमेंटसमोर आता ‘बंकर’ उभारण्यात आले असून २४ तास बंदूकधारी सुरक्षारक्षकांचा गराडा या परिसराला असतो. कौशांबीकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर कसून तपासणी केली जाते. त्यामुळे वाहतुकीला होणारा विलंब व ‘आम आदमी’ला होणारा त्रास वेगळाच! या युद्धभूमीतून माग काढत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केजरीवाल विधानसभेत अर्धा तास उशिरा पोहोचले होते. साधेपणा टिकवून ठेवण्यातच अरविंद केजरीवाल यांची शक्ती वाया जाण्याची भीती आहे, पण याविरोधातबोलण्याची सोय नाही. जो बोलेल तो ‘आप’ला नाही; भाजपवाला-काँग्रेसवाला अशी लगेच ओरड सुरू होते.
शनिवारी झालेल्या पहिल्याच जनता दरबारात अरविंद केजरीवाल यांना पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. हौशे-गवशे आल्याने काम तर झालेच नाही; उलट केजरीवाल यांना दरबार गुंडाळावा लागला. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तरी केजरीवाल यांनी राजशिष्टाचाराचा भाग म्हणून सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे ऐकायला हवे, कारण गर्दीला चेहरा नसतो. ‘आम आदमी’ने लादलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या अरविंद केजरीवाल यांना सरकारी सुविधांचा अकारण तिटकारा असल्याने निर्णयांच्या अंमलबजावणीत त्यांची दमछाक होत आहे. केजरीवाल सरकारी वाहन वापरत नसल्याचे आपल्याला कोण कौतुक, पण खासगी वाहन वापरत असले तरी त्यात पेट्रोल मात्र सरकारी आहे.
सरकारी सुविधांचा वापर सरकारी कामासाठीच; वैयक्तिक कामासाठी नाही, हे साधेपणाचे अत्यंत सामान्य सूत्र आहे. साधी राहणी व प्रामाणिक वर्तनासाठी मधू दंडवते प्रसिद्ध होते. रेल्वेमंत्री असताना मधू दंडवते यांच्या मुलाच्या विवाहाच्या निमंत्रण पत्रिका त्यांच्या पी.ए.ने मंत्रालयाच्या सरकारी पाकिटातून पाठविल्या. ही बाब मधू दंडवते यांना समजताच ते प्रचंड संतापले. सारी पाकिटे त्यांनी परत मागवली व स्वत: पैसे खर्च करून टपाल तिकिटे चिकटवून सर्व पत्रिका नव्याने पाठविल्या.
पहिल्यांदाच खासदार होणाऱ्यांना दिल्लीत सरकारी घर मिळते. काहींच्या सरकारी घराचे रूपांतर ‘पंचतारांकित’ बंगल्यात होते. हे बंगले पाहिले की ‘ओबीसी’ समाजात आर्थिक ‘समता’ प्रस्थापित झाल्याची मनोमन खात्री पटते. ‘मालवणी’ जेवणासाठी खासदारसाहेब आपल्या बल्लवाचार्यास विमानाने दिल्लीत आणतात. माजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्र्याच्या कन्येसाठी विमानाच्या उड्डाणाची ‘वेळ’ बदलली जाते. शिवाय ‘साहेब’ किती पॉवरफुल आहेत हे सांगण्यासाठी हा प्रसंग चवीने चघळला जातो. एकीकडे अशी उदाहरणे असताना ‘शिवार ते संसद’ गाठणाऱ्या राजू शेट्टी यांचे साधेपण उठून दिसते. घरी गप्पांसाठी निमंत्रित केल्यावर ‘भडंग’ व दोन कप चहासोबत साखर कारखान्यांचे राजकारण सांगणाऱ्या राजू शेट्टींना स्वत:च्या साधेपणाला ‘ग्लॅमर’ मिळवून द्यावेसे वाटत नाही.
बाह्य़ जगासाठी भाजपमधील संघटनमंत्री या पदाला फारसे महत्त्व नसले तरी, कुशाभाऊ ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांमुळे या पदाची प्रतिष्ठा अधिक वाढली. भाजपच्या ११, अशोका रस्त्यावरील केंद्रीय कार्यालयातील एका लहानशा खोलीत कुशाभाऊ ठाकरे राहत असत. तेथूनच ते देशभरातील भाजपचा गाडा हाकत. नरेंद्र मोदी दिल्लीत असताना त्यांचा मुक्काम याच खोलीत असे. आता ती खोलीही पाडण्यात आली आहे. भारतीय मजदूर संघासारखे संघटन देशभरात उभे करणारे दत्तोपंत ठेंगडी राज्यसभा खासदार असताना दिल्लीत पायी फिरत असत. केंद्रीय गृहमंत्री इंद्रजीत गुप्ता पदावर असताना अत्यंत साध्या घरात राहत असत. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश शास्त्री भवनातील आपल्या कार्यालयातून निवासस्थानी पायी जातात. त्यांच्यासोबत ना सुरक्षारक्षक असतो ना कुणी अधिकारी. साधेपणाचे ग्लॅमर जी. के. मूपनार, रवी रे, इंद्रजीत गुप्ता, एच. वी. कामत, मधू लिमये, सुंदरसिंह भंडारी यांनाही नव्हते. साधेपणा भूषणावह आहे म्हणून ‘उच्च राहणी व उच्च विचारसरणी’ हे तत्त्व चुकीचे ठरवता येणार नाही. त्यासाठी ‘गरज व चैन’ याची व्याख्या निश्चित करावी लागेल. आम आदमी पक्ष सरकारी यंत्रणेचा वापर करताना नेमका ‘गरज की चैन’ याच विवंचनेत आहे. त्यातून बाहेर पडला तर घोषणांची प्रभावी अंमलबजावणी ‘आप’ला करता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2014 रोजी प्रकाशित
गरज की चैन..
केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांच्या साधेपणाचे कवतिक झाल्यानंतर प्रत्यक्षात ही अशी साधी राहणी बहुतेकांसाठी गैरसोयीची ठरू लागल्याचे लक्षात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-01-2014 at 12:42 IST
मराठीतील सर्व लाल किल्ला बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap janta darbar need or enjoyment