वयाच्या सातव्या वर्षी चुकून पाकिस्तानमध्ये पोहोचलेल्या गीता या मुलीस दहा वर्षांनंतर पुन्हा भारतात आणण्यात येत असल्याची बातमी ज्या पद्धतीने गाजते आहे, ते पाहून अनेकांना आनंदच वाटणे साहजिक आहे. गीता नावाची कर्णबधीर मुलगी भारत पाकिस्तानला जोडणाऱया समझौता एक्प्रेसमध्ये बसली काय आणि कुणाच्याही नकळत पाकिस्तानात पोहोचली काय. तेथे तिचा सांभाळ कराचीतील बिल्किस एढी यांनी ममत्वाने केला. या काळात समज वाढू लागल्याने गीताला छायाचित्रातील आपले पालक ओळखता येऊ लागले. त्याचाच आधार घेत ती आता पुन्हा भारतात आपल्या खऱयाखुऱया मातापित्यांना भेटण्यासाठी येते आहे. गीता मूळची भारतीय असल्याने तिचे आनंदी स्वागत करणे अजिबातच गैर नाही. पण या आनंदाला राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठेची फोडणी देऊन, आनंद म्हणजेच जणू राष्ट्रनिष्ठा, असा ग्रह करून घेतला जातो आहे. त्याचवेळी पाकिस्तानातून भारतात येऊन येथे स्थायिक होऊ इच्छिणाऱया अदनान सामी याच्यासारख्या कलावंताला विरोध का? या प्रश्ऱनाचे उत्तरही देणे आता भाग पाडायला हवे.
विचारातील हा अंतर्विरोध भारतीयांना अंतर्मुख करायला लावणारा आहे. कर्णबधीर असल्याने बोलता येत नसलेल्या गीताला तिचे खरे आईवडिल भेटण्यासाठी त्यांचीच डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. ते योग्यही आहे. यामधील माणुसकीचा गहिवरही समजू शकणारा आहे. परंतु पाकिस्तानला रामराम ठोकून भारताचे नागरिकत्व घेण्यास तयार असणाऱया एखाद्या कलावंताला त्याच न्यायाने भारतीयांनी आपले मानण्यात काय अडचण असते? त्याने दोन्ही देशांचे नागरिकत्व मागितले नाही, की कोणत्याही राजकीय आशयाची वक्तव्ये करून प्रसिद्धीही मिळवली नाही. असे असताना, त्याला भारतीय नागरिकत्व देण्याचा विचार भारताच्या सरकारने केला आहे एवढा मुद्दाच महत्त्वाचा ठरण्याचे काहीच कारण नाही. सामीच्या विरोधकांकडून या मुद्दय़ाला कधीच उत्तरे दिली जात नाहीत. शत्रुराष्ट्र एवढा एकच शब्द अशावेळी पुरेसा ठरतो. परंतु सुज्ञांनी त्याला शरण जाण्याचे अजिबातच कारण नाही. त्यांनी गीता आणि अदनान सामी यांच्याबाबत विरोधाभासाची भूमिका घेण्याचेही कारण नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ई-एडिट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geeta comes home