विराट जीवनप्रवाहातील एक अंशमात्र असलेला जीव जेव्हा स्वत:ला वेगळं आणि स्वतंत्र मानू लागतो, संकुचित ‘मी’ची सत्ता स्थापित करू पाहतो तेव्हा त्याच्या अंत:करणात मायेचं स्फुरण होतं. ‘‘ते मायेच्या निजपोटीं। भयशोकदु:खांचिया कोटी। ब्रह्माशिवादींचे लागे पाठी। इतरांची गोठी ते कोण।।४६२।।’’ अहो ही माया ब्रह्म आणि शिवाच्याही पाठी लागते, म्हणजेच या चराचराचं सर्जन करणारा ब्रह्मदेव आणि या चराचराचा पूर्ण विलय करणारे भगवान शंकर या दोघांनाही मायेच्या पार व्हावं लागतं. हे थोडं वेगळ्या संदर्भात समजून घेऊ. चराचराचं सर्जन ब्रह्मदेव करतो, पण आपल्या मनात अनंत कल्पनांचं सर्जनही होत असतंच. जे मनानं निर्माण केलं असतं, ते तोडून टाकणं मनाला शक्य होत नाही. ते नष्ट करण्याची मनाचीच क्षमता असते, पण तरीही त्या कल्पनांचा लय करताना मनाला किती निर्धार करावा लागतो! आणि अशा मायेत अडकलेलं मन हे भय, शोक आणि दु:खांमध्ये भरडलं जातं. त्या महामायेची जर निवृत्ती करायची असेल, त्या मायेतून जर मोकळं राहायचं असेल, तर? ‘‘ते महामायेची निवृत्ती। करावया दाटुगी भगवद्भक्ती। स्वयें श्रीकृष्ण येचि अर्थी। बोलिला अर्जुनाप्रती गीतेमाजीं।। ४६३।।’’ त्या मायेच्या पकडीतून, प्रभावातून सुटायचं असेल, तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवंताची भक्ती केली पाहिजे. ही भक्ती कशी करायची? तर ‘दाटुगी’ म्हणजे प्रगाढ. भगवंतानं गीतेतही सांगितलं आहे की, ‘‘मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते।।’’ जे पूर्णपणे माझे होतात, तेच मायेतून तरून जातात! आपली मायेवरच ‘दाटुगी’ भक्ती असते, मग तिच्यातून निवृत्त कसं होणार? उलट आपण भगवंताची जी थोडीफार भक्ती करतो तीसुद्धा मायेवरच्याच प्रेमापोटी! म्हणजे जे जे मायेचं वाटत असतं, ते टिकावं, यासाठीच भक्ती असते. माया म्हणजे तरी काय? तर जी नसूनही असल्यागत भासते आणि अडकवून टाकते ती. मध्ये एक वाक्य वाचलं होतं की, ‘आरशात चेहरा आणि जगात सुख असत नाही, फक्त दिसतं!’ तसं आहे. जगात सुख का नाही? तर इथं ज्याच्या त्याच्या जगण्याचं केंद्र ‘मी’ आहे. प्रत्येकालाच आपला स्वार्थ पूर्ण करण्याची तळमळ आहे. मग सदोदित सर्वच जण सारखेच सुखी कसे असतील? तर ते शक्य नाही. मग जे आहे त्यात सुख मानलं तरच सुखाच्या ओढीतून सुटण्याची प्रक्रिया सुरू होईल. मग मन अपेक्षारहित झाल्यानं या जगात राहूनच खऱ्या अर्थानं सुखीही होता येईल. मन प्रथम असं पूर्ण मोकळं राहू शकत नाही. त्यामुळे मायेतून सुटण्यासाठी आणि सुटताच त्याला पर्याय लागतो आणि हा पर्याय आहे भगवंताची भक्ती! जर ती सातत्यानं करीत गेलो तर ती हळूहळू गाढ आणि मग प्रगाढ बनेल आणि एकदा का प्रगाढ म्हणजे अगदी पूर्णत्वास गेली, खोलवर रुजली की मायेत राहूनही मायेच्या प्रभावातून मुक्त राहता येईल. ही माया भगवंताचीच शक्ती आहे आणि त्यामुळे त्याच्या भजनानंच ती तिचा प्रभाव काढून घेते. या भक्तीशिवाय ब्रह्मज्ञानदेखील व्हायचे नाही. (न करितां भगवद्भजन। ब्रह्मज्ञान कदा नुपजे।।) मग सामान्य शब्दज्ञानाची गोष्टच सोडा. नाथ सांगतात, ‘‘जरी जाहले वेदशास्त्रसंपन्न। तिहीं न करितां भगवद्भजन। मायानिवर्तक ब्रह्मज्ञान। तयांसीही जाण कदा नुपजे।।४६९।। शब्दज्ञानाची व्युत्पत्ती। दाटुगी होय लौकिक स्थिती। मायानिवर्तक ज्ञानप्राप्ती। न करितां हरिभक्ती कदा नुपजे।। ४७०।।’’
– चैतन्य प्रेम