बदलापूर : बदलापूर शहरात सुरू असलेल्या विविध खोदकामांमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्या दररोज खंडीत होत आहेत. त्यामुळे त्याचा दैनंदिन पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असून पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आले आहे. कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याला हे खोदकामच कारणीभूत ठरत असल्याचे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे. उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते बदलापूर शहराला दिले जाते. यासोबतच अंबरनाथ शहरालाही हे पाणी दिले जाते. दोन्ही शहरांमध्ये व्यवस्थापन संस्था म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम करते. मात्र दोन्ही शहरात पाणी पुरवठ्यातील तक्रारी गेल्या काही वर्षात वाढल्या आहेत. दोन्ही शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढली. मात्र विस्तारित शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा जीवन प्राधिकरणाकडे नाही. अनेक ठिकाणी शेवटच्या ठिकाणी असलेल्या इमारती, घरांना कमी दाबाने किंवा अनियमित पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे वर्षभर विविध ठिकाणी पाणी टंचाई जाणवत असते.

त्यात आता अंबरनाथ आणि बदलापूर शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यात बदलापूर शहरात प्रामुख्याने कुळगाव बदलापूर नगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पोलिस खात्याकडून सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा, वाहिन्या बसवणे आणि महानगर गॅस जोडणीसाठी अशा विविध कामांसाठी खोदकाम सुरू आहे. या सर्व खोदकामांमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिन्या आणि नळ धारकांच्या जलवाहिन्या फुटल्याचे प्रमाण वाढल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे दररोज कोणत्या न कोणत्या भागात कमी दाबाने अथवा अनियमित पाणी पुरवठा होतो असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

\प्रतिक्रियाः मुळात शहरात प्राधिकरणाच्या कामगिरीमुळे ३० टक्के पाणी गळती आहे. ही गळती रोखण्यात प्राधिकरणाला यश आलेले नाही. त्यात नाल्यातील जलवाहिन्या काढण्यात यांना यश आलेले नाही. अशाच शहरातल्या कामावर खापर फोडणे हे दुर्दैवी आहे. – संभाजी शिंदे, महामंत्री, भाजप.
प्रतिक्रियाः दररोज विविध ठिकाणी जलवाहिन्या फुटत आहेत. त्याची माहिती मिळताच जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी दुरूस्तीची कामे करतात. मात्र त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो आहे. आम्ही तातडीने दुरूस्ती करून पाणी पुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घेतो. – सुरेश खाद्री, उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बदलापूर.