नागरिकांना सशस्त्र गस्त घालण्याची सूचना; संशयास्पद हालचालींबाबत माहिती कळविण्याचे आवाहन
ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता चड्डी-बनियान टोळीने वसई-विरारमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. या टोळीला रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या असून स्थानिक नागरिकांनाही हातात लाठय़ा घेऊन गस्त घालण्याचे आवाहन केले आहे. वसईतल्या सर्वच पोलीस ठाण्याचे प्रमुख नागरिकांना सावध राहून रात्री गस्ती घालण्याच्या सूचना व्हॉट्सअॅपवरून प्रसारित करीत आहेत.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणारे हे दरोडेखोर ‘चड्डी-बनियान टोळी’ म्हणून कुप्रसिद्ध आहेत. लूटमार करणे आणि प्राणघातक हल्ला करणे हा त्यांचा उद्देश आहे. ते एवढे निर्ढावलेले आणि क्रूर असतात की लूटमार करताना समोरच्या व्यक्तीचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. मुंबईत दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी या टोळीच्या चार दरोडेखोरांना अटक केलीे. या दरोडेखोरांनी या वेळी पोलिसांवरही हल्ला केला होता. ही टोळी अनेक गटांत विभागलेलीे आहे. दिवसभर फिरून ते रेकी करतात आणि रात्री आपला डाव साधतात. अत्यंत चपळ, धाडसी असून कुशलतेने दरोडा घालण्यात तसेच लगेच पळून जाण्यात त्यांचा हातखंडा आहे. वसई-विरार परिसरात या टोळीतील अनेक गट दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. त्यासाठी पोलिसांनी गस्ती वाढवल्या आहेत. अवाढव्य पसरलेल्या शहरामुळे सर्वच ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाहीत. यासाठी नागरिकांना गस्त घालण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. वसई शहराजवळ अनेक गावे आहेत. गावांचा भाग हा कमीे लोकसंख्येचा असतो. तेथे बंगले आणि वाडय़ा असतात. दरोडेखोरांना पळून जाणे सोयीस्कर असते. त्यामुळे नागरिकांनी गट बनवून रात्री पहारा ठेवाला, असे आवाहन पोलिसानी केले आहे. नागरिकांनी टप्प्याटप्प्याने आपापल्या इमारतीत पहारा ठेवला किंवा गस्त घातली तर या टोळ्या येऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. दिवसा कुठली अनोळखी व्यक्ती इमारतीच्या आवारात घुटमळत असेल संशयास्पद अवस्थेत वावरत असेल तर त्वरित पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सर्व इमारतींमध्ये सुरक्षारक्षक नेमून शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन केले आहे. जर सुरक्षारक्षक रात्री झोपताना आढळला, तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही गस्ती वाढविल्या आहेत. नागरिकांनी सर्तक राहिल्यास पुढचे अनर्थ टळू शकतील.
– किरण कबाडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.