भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र मागील काही दिवसापासून बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया ठप्प झाली असल्याने शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.मिरा भाईंदर शहरातील भटक्या श्वानासाठी पालिका प्रशासनाने उत्तन येथे लसीकरण प्रकल्प आणि श्वान निर्बीजीकरण केंद्र उभारले आहे.या केंद्रात दररोज सुमारे तीसहुन अधिक श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया केल्यानंतर हे श्वान पाच ते सात दिवस केंद्रातच ठेवले जातात व त्यानंतर ते पुन्हा त्यांच्या जागी सोडले जातात.मात्र श्वानाची वाढती संख्या पाहता हे केंद्र आता अपुरे पडू लागले आहे.त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी उत्तन येथे नवे निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा
पालिकेमार्फत घेण्यात आला असून त्यासाठी जागेचा शोध सुरु आहे. शहरात श्वानाची संख्या झपाट्याने वाढत असतानाच मागील काही दिवसापासून पालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र बंद असल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने हे केंद्र ठेकेदाराच्या मदतीने चालवले जाते.यात प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात वाद सुरु असल्यामुळे हे केंद्र बंद ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तर पुढील काही दिवस हे केंद्र असेच बंद राहिल्यास शहरात भटक्या श्वानाची समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पशुसंवर्धन विभागाची चौकशी :
मिरा भाईंदर महापालिकेकडून श्वान निर्बीजीकरण करण्याच्या कामात अधिकाऱ्याच्या संगनमतानी ठेकेदाराकडून करण्यात येणाऱ्या गैर कारभाराची तक्रार युवक काँग्रेस चे प्रवक्ते रविंद्र खरात यांनी केली होती. त्यावरून राज्य पशुसंवर्धन विभागाकडून मिराभाईंदर महानगरपालिकेला पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजाची चौकशी करण्याचे तसेच त्याबाबतचा अहवाल तपासून सादर करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत.
सात दिवसात ५७१ जणांना श्वान दंश
मिरा भाईंदर शहरात १ एप्रिल ७ सात एप्रिल अशा सात दिवसीय कालावधीत ५७१ जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतला असल्याची आकडेवारी माहिती अधिकार कागदपत्रातून समोर आली.तर यापुढील दिवसाची आकडेवारी अद्यापही प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे यात मोठी वाढ होणार असून प्रशासनाकडून श्वान निर्बीजीकरण करण्याच्या नावे मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचे आरोप दीपक बेगरी यांनी केले आहेत.
“श्वान निर्बीजीकरण केंद्र मध्ये काही दिवस बंद होते. मात्र आता पासून ते सुरू करण्यात आले असून नियमित कामकाज केले जात आहे” विक्रम निराटले – पशुसंवर्धन अधिकारी ( मिरा भाईंदर महानगरपालिका )
© The Indian Express (P) Ltd