उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत हे राज्य आपल्याकडे राखून इतिहास घडवला. राज्याच्या २१ वर्षांच्या इतिहासात एका पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता राखता आली नव्हती. सत्ता राखण्याच्या या ऐतिहासिक राजकीय लढाईत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी पक्षाची गत झाली आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी पराभूत झाल्याने पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत हेही पराभूत झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपच्या प्रचारातील राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षा, सैन्यदलांसाठी कल्याणकारी योजना आणि धार्मिक पर्यटनाला चालना आदी मुद्दय़ांना मतदारांनी पसंती दिल्याचे दिसते. ७० सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजपने ७० पैकी  ३७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. 

या राज्यात ५९.५१ टक्के मतदान झाले होते. २०१७च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपने ५७ जागा जिंकल्या होत्या आणि कॉंग्रेसने ११ जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत पुष्करसिंग धामी आणि हरीश रावत यांनी आपापल्या पक्षांचे नेतृत्व केले. मात्र, भाजप बहुमताच्या दिशेने घोडदौड करीत असताना धामी यांचा खातिमा मतदारसंघात पराभव झाला. काँग्रेसचे रावत हेही लालकुंवॉं मतदारसंघातून पराभूत झाले. धामी यांचा पराभव काँग्रेसचे उमेदवार भुवनचंद्र कापरी यांनी सहा हजार ५७९ मतांनी केला, तर रावत यांना भाजपचे उमेदवार मोहनसिंग बिश्त यांनी पराभूत केले. दुसऱ्या बाजूला हरिद्वार ग्रामीण जागेवर हरीश रावत यांची कन्या अनुपमा रावत यांनी भाजपच्या स्वामी यतीश्वरानंद यांच्यावर विजय मिळवला.

उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष प्रेमचंद अगरवाल विजयी झाले आहेत. त्यांनी ऋषिकेशमध्ये कॉंग्रेस उमेदवार जयेंद्रचंद रमोला यांचा १९ हजार ५७ मतांनी पराभव केला. रायपूरमधून भाजपच्या उमेश शर्मा काऊ यांनी कॉंग्रेसचे उमेदवार हिरासिंग बिश्त यांआ ३० हजार ५२ मतांनी पराभव केला. हल्दवानी येथील प्रतिष्ठेच्या लढतीत सुमित हृदयेश यांनी भाजपच्या जोगेंदरपाल सिंग रौवतेला यांचा सात हजार ८१४ मतांनी पराभव करत आपल्या मातु:श्री इंदिरा हृदयेश यांचा वारसा कायम राखला आहे. 

मसुरी येथे भाजपच्या गणेश जोशींनी कॉंग्रेसच्या गोदावरी थापली यांचा १५ हजार ३२५ मतांनी, तर राजपूर रोड येथे भाजपच्या खजान दास यांनी कॉंग्रेसच्या राजकुमार यांचा ११ हजार १६३ मतांनी पराभव केला. भगवानपूर येथे काँग्रेसच्या ममता राकेश यांनी आपले दीर आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार सुबोध राकेश यांचा चार हजार ८११ मतांनी परभाव केला. जसपूर येथे काँग्रेसच्या आदेश सिंग यांनी भाजपच्या शैलेंद्र मोहन सिंघल यांचा चार हजार १७२ मतांनी पराभव केला.

रावत यांच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह

काँग्रेसनेते हरीश रावत यांनी गेल्या डिसेंबरमध्ये असहकार्य, उपेक्षा पाहता, आपण राजकारणातून निवृत्त व्हावे, असे पक्षाला वाटत असल्याचा आरोप करून खळबळ उडवली होती. त्यांच्या नाराजीची दखल घेऊन राहुल गांधी यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गटबाजीतून उफाळलेला संघर्ष रोखण्यासाठी दोन्ही गटांत समेट घडवून आणावा लागला होता. मात्र, रावत यांच्या पराभवाने पक्षनेतृत्वाने केलेली मध्यस्थी अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. पक्षनेते रणजीत रावत यांच्या विरोधामुळे हरीश रावत यांना त्यांचा रामनगर मतदारसंघ बदलून लालकुंवॉं मतदारसंघ निवडावा लागला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीतही हरीश रावत यांना ते उभे असलेल्या दोन्ही मतदारसंघांतून पराभव पत्करावा लागला होता. यामुळे पाच वेळा खासदार असलेल्या आणि केंद्रीय मंत्रिपद भूषवणाऱ्या हरीश रावत यांच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जनतेचा विश्वास जिंकला नाही

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी पक्षाचा पराभव स्वीकारत ‘आम्ही जनतेचा विश्वास जिंकू शकलो नाही,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी आमच्या जागा वाढल्या आहेत, त्यामुळे जनतेने आम्हाला प्रमुख विरोधी पक्षाची जबाबदारी दिली आहे. त्याला आम्ही पुरेपूर न्याय देऊ, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

मुख्यमंत्री कोण? भाजपने या राज्यात दोनदा मुख्यमंत्री बदलले. जनमताचा वाढता रोष टाळण्यासाठी पक्षाने ही रणनीती अवलंबली. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हेच पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार मानले जात होते. परंतु मतदारांनी त्यांचा पराभव केला आहे. उत्तराखंडच्या विकासासाठी मुख्यमंत्रिपदी ‘तरुण-तडफदार’ चेहरा धामी यांच्या रूपाने देण्याचा पक्षाचा मानस होता. आता पक्ष मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळय़ात घालतो, याबद्दल उत्सुकता आहे. 

मराठीतील सर्व उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp historic victory uttarakhand chief minister pushkar singh dhami only defeat akp