माजी पंतप्रधान राजीव गांधी मिस्टर क्लीन असं बिरूद मिरवत, मात्र तुमच्या वडिलांचा शेवट भ्रष्टाचारी नंबर वनच्या रूपात झाला होता असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. याप्रकरणी मोदींवर चांगलीच टीकाही झाली. तसेच याप्रकरणी निवडणूक आयोगात त्यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रारही करण्यात आली. मात्र निवडणूक आयोगाने हे प्रकरण निकाली काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्लीन चिट दिली आहे. तसेच या वक्तव्यामुळे मोदींनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही असेही म्हटले आहे.
EC on complaint against PM over ‘Bhrashtachari No1’ remark against Rajiv Gandhi: Prima facie, we did not figure out any literal violation of MCC as given in Election Commission of India instructions. Case is therefore disposed off. pic.twitter.com/flRb6uzoVL
— ANI (@ANI) May 7, 2019
उत्तर प्रदेशातील प्रतापगढ या ठिकाणी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन असे संबोधले होते. ज्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकाही झाली. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी हे भ्रष्टाचारी नंबर वन आहेत असं मोदींनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांना उद्देशून त्यांनी ही टीका केली. काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले होते की, जी पार्टी पहिल्या टप्प्यातील मतदानाअगोदरच स्वतःला पंतप्रधान पदाचा दावेदार मानत होती, ती आता हे मान्य करू लागली आहे की आपण तर उत्तर प्रदेशात केवळ मतं खाण्यासाठी निवडणूक लढवत आहे. आज काँग्रेसची जी अवस्था झाली आहे ते याचे उत्तम उदाहरण आहे.
आता मोदींना त्यांच्या राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून क्लीन चिट मिळाली आहे. हे वक्तव्य करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दरम्यान राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवरून उत्तर दिले होते. आता लढाई संपली आहे, माझ्या वडिलांवर केलेले आरोपही तुम्हाला वाचवू शकत नाहीत असा निशाणा त्यांनी साधला होता.