भारतीय हद्दीत चीनकडून सातत्याने घुसखोरी होत असतानाही या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळलेले मौन गूढ असल्याची टीका सपाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी केली आहे.
देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, चीनकडून भारतीय हद्दीत सातत्याने घुसखोरी होत आहे, मात्र त्याबाबत नरेंद्र मोदी यांनी मौन पाळल्याने चीनला प्रोत्साहनच मिळत आहे, असेही मुलायमसिंग म्हणाले.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू कोणत्याही आजारपणामुळे झाला नाही तर चीनने घुसखोरी केल्याने बसलेल्या धक्क्य़ामुळे झाला, असेही मुलायमसिंग म्हणाले. आपले राजकीय गुरू नथूसिंग यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुलायमसिंग येथे आले होते.
जनतेला खोटी आश्वासने देऊन आणि दिशाभूल करून आणि प्रचारतंत्राचा वापर करून नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय संपादन केला. परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आणि बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी केले, मात्र या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आतापर्यंत कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सरकार उत्तम कामगिरी करीत असल्याचे प्रशस्तिपत्र मुलायमसिंग यांनी दिले. गरीब आणि तळागाळातील जनतेच्या उद्धारासाठी राज्य सरकारने विविध विकास कार्यक्रम हाती घेतले असून अनेक योजना राबविल्या आहेत, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi has maintained mysterious silence on china mulayam