पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर सर्वात लोकप्रिय नेते आहेत. विरोधकांनाही हे मान्य करावेच लागेल, अशा शब्दांत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली आहेत. मोदी जनतेच्या विश्वासाला खरे उतरले आहेत, असेही शहा म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाबमधील निकालांचे कल जवळपास हाती आले आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. उत्तर प्रदेशसह देशभरातील भाजपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करत आहेत. निवडणूक निकालानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. सुरुवातीला त्यांनी पाचही राज्यांतील जनतेचे आभार मानले. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातील निकाल हे उत्साह वाढवणारे आहेत, असे त्यांनी म्हटले. या चारही राज्यांत भाजप सरकार स्थापन करणार आहे. हा निकाल देशाच्या राजकारणाला नवीन दिशा देणारा आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक विजय आहे. हा जनतेचा आणि त्यांच्या इच्छाशक्तीचाच खरे तर विजय म्हणावा लागेल, असेही अमित शहा म्हणाले.

यावेळी शहा यांनी या विजयाचे श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. निवडणुकांमध्ये झालेला भाजपचा विजय हा नरेंद्र मोदींचा आहे. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा हा विजय आहे. पंतप्रधान मोदींनी आणि केंद्र सरकारने केलेल्या कामावर जनतेने विश्वास ठेवला आहे. जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींवर जनतेने विश्वास दाखवला आहे. नरेंद्र मोदी हे जनतेच्या विश्वासाला खरे उतरले आहेत, असे शहा म्हणाले. हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा विजय असून, स्वातंत्र्यानंतर मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते आहेत, हे सिद्ध झाले आहे. विरोधकांनाही हे मान्य करावे लागेल, असेही ते म्हणाले. नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निवडणूक प्रचारात आरोप करणाऱ्या विरोधकांनाही शहा यांनी सुनावले. मोदी आणि केंद्र सरकारविरोधात अपप्रचार करणाऱ्यांना जनतेने जबरदस्त उत्तर दिले आहे. घराणेशाही, जातीवाद आणि लांगूलचालनाच्या राजकारणाला मतदारांनी नाकारले आहे. हेच या निकालांतून स्पष्ट झाले आहे. या निकालांमुळे खरे तर भाजपची आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे हा विश्वास सार्थ ठरवून सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही शहा यांनी सांगितले. पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान झाल्यानंतर आम्ही ९० जागा जिंकण्याचा दावा केला होता. त्यावर विरोधकांनी खिल्ली उडवली होती. पण या दोन टप्प्यांतील १२५ पैकी तब्बल ११५ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. उत्तर प्रदेशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरलीय, असेही ते म्हणाले. निवडणूक निकालानंतर मायावती यांनी मतदानयंत्रात फेरफार केल्याचा आरोप केला आहे. तसेच हिंमत असेल तर मतपत्रिकेद्वारे पुन्हा मतदान घेण्याचे आव्हान दिले आहे. या आरोपांना उत्तर देताना त्यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. मायावती यांची मानसिकता मी समजू शकतो. त्यावर न बोललेलेच बरे. त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. पंजाबमधील पराभव आम्ही स्वीकारला आहे. त्याचे आम्ही आत्मपरीक्षण नक्कीच करू, असेही ते म्हणाले.

चार राज्यांतील नेतृत्वावर उद्या शिक्कामोर्तब

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मणिपूर आणि गोव्यात भाजप बहुमताकडे वाटचाल करत आहे. त्या पार्श्वभूमीवर या चारही राज्यांचे नेतृत्व कोण करणार, असे विचारले असता, पक्षाच्या सर्वात योग्य व्यक्तींना मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे ते म्हणाले. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चार राज्यांचे नेतृत्व कोण करणार हे ठरेल, असेही अमित शहा यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh assembly elections 2017 amit shah press conference bjp congress samajwadi party bsp narendra modi