कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली जात असताना त्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे होते. या कामाकडे केलेले दुर्लक्ष निवडणुकीतील पराभवास काहीअंशी कारणीभूत ठरले, अशी कबुली खासदार विशाल पाटील यांनी शनिवारी येथे दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात आणि लोकशाही व मतदारांच्या हक्काच्या संरक्षणासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस भवनात निदर्शने करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पक्षपती कामकाजाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खासदार विशाल पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, प्रदेश सचिव शशांक बावचकर, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, राहुल पी. पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार पाटील म्हणाले,

लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक झाली. या काळामध्ये ५० लाख मतदार वाढवले गेले. इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार कसे नोंदवले गेले हा संभ्रम आहे.

निकालाचे आकडे संशय निर्माण करणारे आहेत. या विरोधात न्यायालयीन लढाई देण्यासाठी काँग्रेस पक्षाने सबळ पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. जनतेच्या मनातील भावना लक्षात घेऊन रस्त्यावरील संघर्षाची भूमिका कायम राहणार आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी निकालानंतर आम्ही आयोगाकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारित माहिती मागवली असताना ती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आयोगाच्या कामकाज पद्धतीविषयी संशय वाढीस लागला असल्याची टीका केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp vishal patil analysis defeat in maharashtra assembly election zws