महायुतीतील घटकपक्ष असलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू भाजपाला लक्ष्य करत आहेत. भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो. नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो. हे चांगलं नाही, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी भाजपाला खडसावलं आहे. ते हिंगोलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, “भाजपाकडून जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचं काम केलं जात आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अचलपूर मतदारसंघात अनिल बोंडे यांना लक्ष घालण्यास सांगितलं. पण, बोलून कुणी लक्ष घालत नाही. एकीकडं सांगायचं सरकारमध्ये सामील व्हा. सामील झाल्यानंतर अशा प्रकारची भूमिका घ्यायची. हे कुणासाठीही चांगलं नाही.”
हेही वाचा : भाजपच्या कुरघोडीमुळे आमदार बच्चू कडू अस्वस्थ!
“ज्यांच्याबरोबर आहोत, त्यांच्याशी प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होईल. बावनकुळे स्पष्ट बोलले, ‘काहीही करून कसं पाडायचं, कोणत्या पद्धतीनं जायचं.’ मला वाटतं, भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो. नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो. हे चांगलं नाही,” असं बच्चू कडूंनी म्हटलं.
हेही वाचा : अधिष्ठातांना शौचालय साफ करायला लावणं भोवलं, अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होताच हेमंत पाटील म्हणाले…
“बच्चू कडूंना कुठलाही त्रास नाही”
दरम्यान, बच्चू कडू यांनी ‘भाजपाकडून त्रास आहे’ असं विधान केलं होतं. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “बच्चू कडू आमचे मित्र आहेत. कडू हे महायुतीचे घटक असून, त्यांना कुठलाही त्रास नाही. बच्चू कडू स्वत:हा निवडून येण्यास सक्षम आहेत. पण, अधिक चांगल्या मताने निवडून येण्यासाठी आम्हीही त्यांच्याबरोबर आहोत.”