नारायणगाव : शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे नेहमी ऐकायला येते. मात्र, टोमॅटो उत्पादनातून शेतकरी कोटय़धीश झाल्याचे उदाहरण जुन्नर तालुक्यातील पाहावयास मिळाले. ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर या दाम्पत्याने १२ एकर टॉमेटो क्षेत्रातून अवघ्या दोन महिन्यांत २ कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारावीपर्यंत शिक्षण झालेले ईश्वर गायकर आणि त्यांच्या पत्नी सोनाली गायकर हे दाम्पत्य गेली अनेक वर्ष टोमॅटोचे पीक घेत आहेत. २०२१ मध्ये हवामानामुळे पीक वाया गेले आणि १६ ते १७ लाख रुपयांचे भांडवल खिशातून गेले. गेल्या वर्षी टॉमॅटोने सुमारे २० लाख उत्पन्न दिले. पुन्हा एप्रिल महिन्यात १२ एकर क्षेत्रामध्ये ६० हजार टोमॅटो रोपांची लागवड केली. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ संजय नवले, गोपीनाथ दिवेकर आणि वडील तुकाराम गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली देखभाल करून योग्य नियोजन केल्याचे ईश्वर यांनी सांगितले. टोमॅटो रोप लागवडीसह खते, औषधे फवारणी, मांडव करणे, टोमॅटो बांधणी आणि मजुरी असा एकूण ४० लाख रुपये खर्च आला. टोमॅटो तोडणी सुरू झाल्यानंतर १५ हजार क्रेट विक्रीद्वारे २ कोटी ३० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. अद्याप ६ ते ७ हजार क्रेट विक्रीस जातील, अशी माहिती ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers make crores from tomato cultivation zws