२४ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द सरकारनं दिला आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं. अन्यथा सरकारला जड जाईल. आमच्यावर अन्याय करत राहिला, तर मर्यादा आणि संयम कितीदिवस बाळगायचा, याचाही विचार करावा लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. ते जालन्यातील सभेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “सरकारच्या शिष्टमंडळानं सर्व गुन्हे मागे घेण्याचं आणि एकालही अटक न करण्याचं आश्वासन दिलं होतं. मग, आंतरवालीतील कार्यकर्त्यांना अटक का करण्यात आली? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कुठला डाव रचला आहे? खोटं बोलून आमच्याशी गद्दारी करू नका. दोन दिवसांत सरकारनं सर्व गुन्हे मागे घ्यावे.”

“पाच कोटी मराठे तुरुंगात जाण्यास भीत नाही”

“पोलीस अधीक्षक आणि पोलिसांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला घडवला, हे आम्ही विसरणार नाही. पुन्हा डाव रचू नका. पहिल्या अधीक्षकांना बढती देण्यात आली. आता कार्यकर्त्यांना अटक करून दुसऱ्या अधीक्षकांना बढती देणार का? पण, आम्ही पाच कोटी मराठे तुरुंगात जाण्यास भीत नाही,” असंही जरांगे-पाटलांनी सांगितलं.

“लातूरमध्ये सभा होणार आहे”

“लातूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजाचा रोष पत्करू नये. लातूरमध्ये सभा होणार आहे,” असा निर्धार जरांगे-पाटलांनी व्यक्त केला.

“ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकींच्यावर अन्याय करत आहेत”

“ओबीसीमधील जातींवरही यांनी ( छगन भुजबळ ) अन्याय केला आहे. २००९ ते २०१४ मधील ओबीसी महामंडळातील ८० टक्के हिस्सा एकट्यांनी खाल्ला आणि २० टक्के बाकींच्या ३०० जातींना दिला आहे. ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकींच्यावर अन्याय करत आहेत,” अशी टीकाही जरांगे-पाटलांनी छगन भुजबळांवर केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil warning shinde govt maratha reservation chhagan bhujbal jalana ssa