‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रणवीरने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले आहेत. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात मराठा योद्धा बाजीरावच्या भूमिकेने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली, असे रणवीरने म्हटले आहे. पेशवा बाजीरावच भूमिका साकारणे माझ्यासाठी आयुष्य बदलविणारा अनूभव होता, असे ट्विट रणवीरने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात मस्तानीच्या भूमिकेत दिसलेल्या दीपिका पदुकोणने देखील चित्रपटाच्या वर्षपुर्तीनिमित्त संजय लीला भन्साळींचे आभार मानले आहेत. या चित्रपटातील आव्हानात्मक भूमिका ही अविस्मरणीय असल्याचे सांगत दीपिकाने आभार व्यक्त केले आहेत. या चित्रपटात प्रियांका चोप्रा काशीबाईच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटापूर्वी दीपिका-रणवीर ही जोडी संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. प्रियांकाने देखील या चित्रटातील अविस्मरणीय भूमिकेबद्दल आभार मानले आहेत. काशीबाईच्या रुपातील भूमिकेला अविस्मिरणीय केल्याबद्दल संजय सर, रणवीर सिंग आणि दीपिका यांचे आभारी आहे. असे ट्विट प्रियांकाने केले आहे.

संजय लीला भन्सालींचा ‘बाजीराव-मस्तानी’ अनेक कारणांनी वादाच्या केंद्रस्थानी सापडला होता. मात्र या चित्रपटाने सोनी गिल्ड पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार मिळवत बाजी मारली होती. सोनी गिल्ड पुरस्कार सोहळ्यात ‘बाजीराव-मस्तानी’ने एकूण ९ पुरस्कार मिळवले. यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता,  सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन याचा समावेश होता.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना एकत्र घेऊन संजय लीला भन्साळी आणखी एक आगामी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या सुरु आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाची अतिशय महत्त्वाची भूमिका असणार आहे. दीपिका या चित्रपटात राजपूत राणी ‘पद्मावती’ची भूमिका साकारणार आहे. तर, अभिनेता शाहिद कपूर राजा रतन सिंगच्या भूमिकेत झळकणार आहे. भन्साळींच्या चित्रपटातून बऱ्याचदा प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटामध्ये अलाउद्दिन खिल्जीच्या रुपात दिसेल.

एके काळी स्वप्न म्हणून पाहिलेला चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ पडद्यावर आणण्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना यश मिळालेच. मात्र या त्यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाने केवळ तिकीटबारीवर यश मिळवून दिले असे नाही तर सात राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले. भन्साळींना पहिल्यांदा या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peshwa bajirao character changed my life says ranveer singh