‘कलर्स’ वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘शास्त्री सिस्टर्स’ या मालिकेत कानपूरहून दिल्लीला स्थलांतरित झालेल्या चार किशोरवयीन बहिणींची कथा सांगण्यात येणार आहे. नेहमीच्याच चाकोरीतील एक अशी वाटणाऱ्या मालिकेची खासियत म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून नेहा पेडणेकर, इशिता गांगुली, सोनल वेंगुर्लेकर आणि प्रगती चौरसिया या चार नवीन मुलींवर मालिकेचा डोलारा अवलंबून आहे. वरवर पाहता ही जरी साधी सरळ बहिणींची कथा वाटत असली तरी, अप्रत्यक्षरीत्या मुलींच्या सक्षमतेचा संदेश देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
शाकुंतलम टेलीफिल्म्सची निर्मिती असलेली ही मालिका संध्याकाळी सातला प्रसारित होणार आहे. याआधी शाकुंतलमची ‘ना आना इस देस लाडो’ ही मालिका ‘कलर्स’वर प्रचंड गाजली होती. स्त्री-भ्रूणहत्येसारख्या गंभीर विषयाला हात घातल्यानंतर लगेचच ‘शास्त्री सिस्टर्स’सारखा हलकाफुलका विषय घेऊन येण्याबाबतच आपला उद्देश स्पष्ट करताना शाकुंतलम टेलीफिल्म्सच्या सर्जनशील प्रमुख आणि सहसंस्थापक नीलिमा वाजपेयी यांनी सांगितले, ‘‘दोन्ही मालिका विषयासंदर्भात आणि मांडणीमध्ये परस्परांपेक्षा अगदी भिन्न असल्या तरी त्यांच्या कथेचा गाभा एकच आहे. आम्हाला मुलींच्या सक्षमतेचा मुद्दा मांडायचा होता. ‘लाडो’च्या माध्यमातून आम्ही गावांमध्ये घडणाऱ्या स्त्रीभ्र्रूणहत्यांबाबत लोकांना जागृत करायचे ठरवले होते. पण ‘शास्त्री सिस्टर्स’च्या माध्यमातून कानपूरसारख्या छोटय़ा गावामध्ये स्वत:च्या मुलींना अभिमानाने वाढवणाऱ्या पित्याची आणि त्याच्या मुलींची कथा दाखवण्यात येणार आहे. ‘लाडो’सारख्या घटना आपल्या आजूबाजूला तितक्याशा प्रमाणात दिसत नाहीत, त्यामुळे त्या विषयाचे गांभीर्य तितके जाणवत नाही. पण, ‘शास्त्री सिस्टर्स’सारखी कुटुंबे आपल्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे हा विषय लोकांना आपलासा वाटू शकतो.’’
विधुर असूनही मुलींना अभिमानाने वाढवणाऱ्या वडिलांच्या व्यक्तिरेखेबाबत सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘चार मुलींचा बाप म्हणून आपल्याकडे अशा वडिलांना कमनशिबी समजले जाते. पण या मालिकेतील बापाला आपल्या मुलींचा अभिमान आहे. त्या केवळ मुली आहेत म्हणून त्यांना अमुक एखादी गोष्ट जमत नाही असे तो समजत नाही. अगदी लग्नासारख्या नाजूक विषयांमध्येही केवळ मुलीची बाजू म्हणून ते तडजोड करायला तयार नाहीत. अशा प्रकारे वडिलांचीही समाजात बदलत जाणारी विचारसरणी पहिल्यांदाच या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे वाजपेयी यांनी सांगितले.
तसेच त्यांच्या मुलीही तितक्याच समजूतदार आणि स्वावलंबी आहेत. आम्हाला नेहमीच्या सरळधोपट मार्गाने एक नायिका आणि तिच्या चार बहिणी असा प्रकार दाखवायचा नव्हता. या चारजणी मालिकेच्या नायिका आहेत. त्यांना स्वतची मते आणि स्वभाव आहेत. त्यांच्यात एकमेकांवर कुरघाडी करण्याची कोणतीही स्पर्धा चालू नाही. कोणत्याही घरातील बहिणींप्रमाणे त्या भांडतात, हसतात, मस्ती करतात. त्यांचे प्रत्येकाचे प्रश्न भिन्न आहेत, त्यांना सोडवण्याचे त्यांचे उपायही भिन्न आहेत. त्यामुळे एका अर्थाने पाहिल्यास ही मालिका नेहमीच्या सासू-सून मालिकांपेक्षा वेगळी असल्याचे त्या सांगतात.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Aug 2014 रोजी प्रकाशित
‘शास्त्री सिस्टर्स’
‘कलर्स’ वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘शास्त्री सिस्टर्स’ या मालिकेत कानपूरहून दिल्लीला स्थलांतरित झालेल्या चार किशोरवयीन बहिणींची कथा सांगण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-08-2014 at 12:25 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shastri sisters