‘झी मराठी’वरील ‘काहे दिया परदेस’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. आजही प्रेक्षक या मालिकेबद्दल बोलताना दिसतात. त्यातील कलाकारांचं आजही त्यांच्या कामासाठी कौतुक होतं. मराठी मुलगी व अमराठी मुलगा, अशा शिव-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं होतं. त्यामध्ये गौरीची भूमिका अभिनेत्री सायली संजीव हिनं साकारली होती आणि शिवची भूमिका अभिनेता ऋषी सक्सेनानं साकारली होती.

‘काहे दिया परदेस’ ही मालिका २०१६ साली सुरू झाली होती. एक-दीड वर्षाच्या कालावधीनंतर या मालिकेनं २३ सप्टेंबर २०१७ साली प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु, यादरम्यान मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. शिव-गोरी ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक होती. अशातच आता मालिकेत शिवची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला अभिनेता ऋषी सक्सेना यानं मालिकेत त्याची निवड कशी झाली याबद्दल सांगितलं आहे.

ऋषीनं नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यानं या मालिकेबद्दल सांगितलं आहे. मुलाखतीमध्ये ऋषीला ही मालिका त्याला कशी मिळाली याबाबत विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, “माझा एक को-ओर्डिनेटर मित्र आहे. त्याला मी विचारलं होतं की, तू काही को-ओर्डिनेशन करतोय का मी ऑडिशन देऊ शकतो का आणि त्यानं मला सांगितलं, “मी एका मराठी मालिकेसाठी को-ओर्डिनेशन करीत आहे आणि त्यांना एका हिंदी पात्राची गरज आहे. तो म्हणाला की, तू प्रयत्न कर. तेव्हा मी त्याला विचारलं की, कसं पात्र आहे? त्यावर तो म्हणाला “मला तेवढं माहीत नाही; पण त्यांनी एका हिंदी पात्राची गरज आहे, असं सांगितलं आहे.”

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल बोलताना ऋषी पुढे म्हणाला, “त्यानं मला सांगितलं की, मराठी मालिका आहे आणि हिंदी पात्र हवंय. त्यामुळे छोटीच भूमिका असेल. तू प्रयत्न करून बघ. म्हणून मी तिकडे गेलो आणि तो ऑडिशनचा शेवटचा दिवस होता. तेव्हा अजय मयेकर सर स्वत: ऑडिशन घेत होते. तेव्हा अजयसरांनी मला तू मुंबईत नवीन आहेस, एका बस स्टॅण्डवर उभा आहेस आणि मागे वळून बघतोस, तर तुझी बॅग तिथे नसते. त्यामुळे तू घाबरतोस आणि ती बॅग शोधायला लागतोस, असं म्हणत हे तू कसं करशील ते करून दाखव, असं सांगितलं. तेव्हा मीपण मुंबईत नवीनच होतो. त्यामुळे मी ते ऑडिशन दिलं आणि त्यांना ते आवडलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हेही वाचा

त्याबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “नंतर मालिकेचे निर्मातेही बाहेर आले आणि त्यांनी, “आम्ही मालिकेचे निर्माते आहोत आणि आम्हाला असं वाटतं की, तू यासाठी योग्य आहेस. तू करशील का, असं विचारलं. लीडची भूमिका असल्यानं मी हो म्हटलं. कारण- माझ्याकडे तेव्हा काहीच काम नव्हतं.” अशा प्रकारे ऋषी सक्सेनाला ‘काहे दिया परदेस’ ही मालिका मिळाली. ही त्याची मुख्य भूमिका असलेली पहिलीच मालिका होती. मुलाखतीमध्ये पुढे ऋषी म्हणाला, “या मालिकेमुळे खऱ्या अर्थानं माझा अभिनेता म्हणून प्रवास सुरू झाला.”