दिशा खातू

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्राह्मण सभा

प्राचीन ग्रीकमध्ये ‘संस्था’ या संकल्पनेचा जन्म झाला. पुढे १७७६ साली याला आधुनिक रूप मिळाले. संस्था या संकल्पनेवर संशोधन होऊन त्यावर सिद्धांत तयार झाले. एक विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी निर्माण व्यक्तींचा समूह म्हणजेच संस्था होय. या व्याख्येनुसारच कार्य करणारी मुंबईतील ब्राह्मण सभा ही संस्था. १३० वर्षांची ही संस्था आजही समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करीत आहे.

अठराव्या शतकात संपूर्ण देश ब्रिटिश अमलाखाली होता. त्यांचे जाचक नियमामुळे जनतेचे हाल होत होते. भारतीय संस्कृतीला धोका निर्माण झाला होता. १९८७ साली मुंबईत ब्रह्म परिषद भरविण्यात आली होती. त्या ब्रह्म परिषदेत या सर्व गोष्टींवर चर्चा झाली आणि इंग्रजांचा सामना करण्यासाठी, भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी तसेच समाजप्रबोधनासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रह्मपरिषदेला श्रीशंकराचार्यानी प्रोत्साहन दिले आणि १९८८ साली ब्राह्मण सभेची स्थापना झाली. संस्थेने नुकतीच १३० वर्ष पूर्ण केली. शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रांत अग्रेसर राहिली आहे. परंपरा आणि संस्कृती टिकविण्यासाठी विविध सण-उत्सव सभेद्वारे साजरे केले जातात. या संस्थेचे वैशिष्टय़ म्हणजे, ब्राह्मण सभा असे जातिवाचक नाव असूनही सर्व धर्म, जातीतील लोकांना समान स्थान दिलेले आहे, सर्व समाजातील व्यक्तींचा या संस्थेत समावेश होतो.

ब्राह्मण सभेचे संपूर्ण कार्य व्यवस्थापकीय मंडळ सांभाळते. २२ जण यातून निवडले जातात होतात आणि १० जण स्वीकृत असतात. या सर्वाकडे समान अधिकार असतात. यातील निवडून केलेल्या सहा जणांना पदाधिकारी बनवण्यात येते. त्यांच्या संमतीने सर्व उपक्रम होतात. तसेच संस्थेचे कायमस्वरूपी सभासद, अनुभवी आणि संस्थेविषयी कळकळ असणाऱ्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून नेमण्यात येते. अध्यक्ष हे व्यवस्थापकीय मंडळाला मार्गदर्शन करीत असतात. ही संस्था अनेक क्षेत्रांत कार्य करीत आहे.

शिक्षणविषयक कार्य

ब्राह्मण सभेने सर्वप्रथम शिक्षणावर भर दिला. इंग्रजी भाषेमुळे भारतीय भाषांचे कमी झालेले महत्त्व वाढवण्यासाठी त्यांनी मराठी, संस्कृत, मोडी इत्यादी भाषांचे मोफत वर्ग सुरू केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य, शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. अपंग आणि अंध विद्यार्थ्यांसाठीही विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. सध्या हे कार्य विद्यार्थी शाखेच्या अंतर्गत चालत आहे. लोकांमधली रुची कमी झाल्यामुळे भाषा वर्ग बंद पडले. मात्र अर्थसाहाय्य आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे काम आजही सुरू आहे. विद्यार्थाबरोबर गरज पडल्यास शाळांनाही मदत दिली जाते. वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन पानवलकर ग्रंथालयाची स्थापनादेखील करण्यात आली होती.

आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान

संस्थेने डॉक्टरांच्या साहाय्याने समाजातील विविध स्तरातील लोकांपर्यंत आरोग्यविषयक प्रबोधन केले. डॉ. म्हस्कर सूतिकागृह, आय.सी.यू, जनरल नर्सिग होमच्या माध्यमातून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. निर्धन आणि दुर्बलांसाठी राखीव बेड आहेत. तसेच येथील सर्व सेवा या तुलनेने कमी दरात उपलब्ध आहेत. इंग्रजांशी लढण्यासाठी मुले तयार व्हावीत या हेतूने व्यायामशाळा चालवली जात होती. तसेच आरोग्याच्या दृष्टीने सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी योगाभ्यासाचे वर्ग चालवले जात होते. आता अद्ययावत व्यायामशाळा बनवलेली आहे. येथील अनेक मुलांनी शरीरसौष्ठव स्पर्धामध्ये चमक दाखवलेली आहे.

उत्सवाची परंपरा

गणेशोत्सव हा ब्राह्मण सभेत पारंपारिक पद्धतीने केला जातो. याबाबत बोलताना उत्सव शाखा कार्यवाह सुभाष भागवत यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रेरणेतून ब्राह्मण सभेने गणेशोत्सव, नवरात्री असे विविध सण

साजरे करण्यास सुरुवात केली. सण-सोहळ्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे उद्दिष्ट त्यांनी कायम ठेवले होते. यंदा त्यांनी १०१ वा गणेशोत्सव साजरा केला. यात अवयव दान या विषयावर प्रबोधन करण्यात आले.

महिला सक्षमीकरण

ब्राह्मण सभेने महिलांचे देखील स्वतंत्र स्थान असावे या हेतूने महिलांना देखील या संस्थेत सहभागी करून घेतले. महिलांसाठी विविध कार्यक्रम, उत्सवांचे आयोजन केले जाते. यात महिलांचे प्रश्न, समस्या, सक्षमीकरण यांवर चर्चा घडवण्यात येते. पुढे १९४१ साली महिला शाखेची स्थापना करण्यात आली. महिला शाखेद्वारे होतकरू आणि लघुउद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी ग्राहक पेठ भरवली जाते. त्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात, असे संयुक्त कार्यवाह स्मिता आठवले यांनी सांगितले.

गरीब, बेघर लोकांना दर आठवडय़ाला अन्नदान आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे वाटप आजही केले जाते. तसेच गरिबांकडे बऱ्याचदा अंत्यविधीसाठीही पुरेसे पैसे नसतात त्यांच्यासाठी या संस्थेमार्फत नाममात्र दरात अंत्यविधी करून देण्याची सोय आहे. ब्राह्मण सभा ही संस्था व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वच बाबतीत समाजातील वंचित घटकांना साहाय्यक म्हणून काम करते. पूर्वी इंग्रजांना विरोध करण्यासाठी उभ्या राहिलेल्या या संस्थेने आता समाजप्रबोधनाला वाहून घेतले आहे.

या सर्व कार्याचे स्वरूप काळानुरूप बदललेले आहे. जसजसे कार्य मोठे झाले तसतशी त्याची वेगळी शाखा बनवली गेली. संस्थेला १३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दर चार महिन्यांनी विविध समाजोपयोगी विषयांवर कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. तसेच वर्षभर अवयव दानावर विविध प्रकारे प्रबोधन करण्याचे कार्य हाती घेतलेले आहे. संस्थेत महिलांसाठी व्यायामशाळा सुरू करणे, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणणे अशा योजना आखण्यात आलेल्या आहेत.

disha.khatu@expressindia.com

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about brahmin sabha organization