उमाकांत देशपांडे
मराठा समाजाची ‘व्होट बँक’ म्हणून ताकद दाखविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि समाजाच्या अन्य नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. मराठा आरक्षण आणि समाजाच्या बाजूने उभे राहणाऱ्या उमेदवारांनाच पाठिंबा द्यावा आणि शक्य असेल तेथे मराठा समाजाचे उमेदवार उभे करावेत, अशी भूमिका नेत्यांनी घेतली आहे. मराठा समाज राजकीय भूमिका घेऊन एकत्रित आल्यास राजकीय पक्षांना ते मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी संघटितरत्या दोन-तीन वर्षे ताकद दाखविली, राज्यभरात मूक मोर्चे काढले आणि सरकारवर दबाव आणून १६ टक्के आरक्षण मिळविले. मात्र हे आरक्षण उच्च न्यायालयात प्रलंबित असून समाजाला लाभ मिळत नसल्याने काही प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजाची राजकीय ताकद दाखवून द्यावी, अशी भूमिका काही नेत्यांनी मांडली आहे. मराठा समाजाच्या उमेदवारांना काही राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे. पण त्यात पक्ष व व्यक्तींची भूमिका महत्त्वाची असून जातीची किंवा समाजाची भूमिका नाही, असे मराठा आरक्षणासाठी बाजू लढणारे प्रा. डॉ. बाळासाहेब सराटे यांनी सांगितले.
वंचित आघाडीपेक्षा मराठा समाजाची ताकद अधिक आहे. मात्र समाजाने एकत्रित येऊन ती ‘व्होट बँक’ म्हणून राजकीय नेत्यांना दाखवायला हवी. आतापर्यंत मराठा समाजाला नेत्यांनी गृहीतच धरले आहे व समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय भूमिका घेऊन समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या उमेदवारांनाच समर्थन द्यावे. त्यासाठी समाजातील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन त्या दृष्टीने पावले टाकावीत, असे आवाहन सराटे यांनी केले आहे.
समाजातर्फे काही मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे व त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. मराठा मोर्चा व समाजाच्या नेत्यांच्या विविध स्तरांवर बैठकाही होत आहेत. समाज म्हणून आम्ही ताकद दाखवून देऊ, असे सराटे यांनी स्पष्ट केले.