एप्रिलअखेरपर्यंत भूखंड रिकामा करून एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याचे झोपु प्राधिकरणाचे नियोजन
मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाअंतर्गत टप्पा १ मधील उर्वरित १५०० झोपड्या हटविण्याच्या कामाला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वेग दिला आहे. एप्रिलअखेरपर्यंत उर्वरित १५०० झोपड्या हटवून भूखंड रिकामा करण्यात येणार असून हा भूखंड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) हस्तांतरित करण्याचे झोपु प्राधिकरणाचे नियोजन आहे.
एमएमआरडीए पूर्वमूक्त मार्गाचा घाटकोपर – ठाणेदरम्यान विस्तार करीत आहे. या प्रकल्पात माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील झोपड्या बाधित होत आहेत. त्यामुळे संपूर्ण रमाबाई नगर आणि कामराज नगरमधील १६ हजार झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीए संयुक्त भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवित आहे. दरम्यान, १६ हजार ५७५ झोपड्यांपैकी प्रत्यक्षात १४ हजार ४५४ झोपड्यांचेच पुनर्वसन संयुक्त भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे.
उर्वरित झोपड्या तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पातून वगळ्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकल्पाच्या करारानुसार झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करणे, झोपड्या हटवणे आणि भूखंड रिकामा करून एमएमआरडीएकडे वर्ग करणे या जबाबदाऱ्या झोपु प्राधिकरणाकडे आहेत. त्यानुसार सप्टेंबर २०२४ पासून पात्रता निश्चिती आणि झोपड्या हटवण्याच्या कामाला एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान टप्पा १ मधील ‘एन १९’ भूखंडावरील दोन हजार ५०० झोपड्या हटविण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात ‘एन १९’ भूखंडावर चार हजार ०५३ झोपड्या असून आतापर्यंत यापैकी तीन हजार ५१९ झोपडीधारकांबरोबर करार करण्यात आला आहे. तीन हजार ५१९ पैकी ९३२ झोपड्या पूर्वमूक्त मार्ग प्रकल्पात थेट बाधित होत आहेत. त्याचवेळी आतापर्यंत चार हजार ०५३ पैकी तीन हजार ७६० झोपडीधारकांचा घरभाड्यापोटीचा धनादेश तयार असून यापैकी दोन हजार ८३२ झोपडीधारकांना धनादेशाचे वाटप करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, झोपु प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यातील झोपड्या हटविण्याच्या कामाचा नुकताच आढावा घेतला. उर्वरित १५०० झोपड्या रिकाम्या करण्याचे काम वेगाने सुरू असून एप्रिलअखेरपर्यंत टप्पा १ मधील सर्व झोपड्या हटवून भूखंड रिकामा केला जाईल, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. हा भूखंड रिकामा झाल्यानंतर तो एमएमआरडीएकडे वर्ग करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भूखंड ताब्यात आल्यानंतर एमएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा काढल्या जाण्याची शक्यता आहे.
© The Indian Express (P) Ltd