नागपूर : सिव्हिल लाईनमधील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जुन्या मैदानाजवळील सेंट उर्सुला शाळेच्या विद्यार्थिनींना मुख्य रस्ता ओलांडताना दररोज वाहन वर्दळीचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेंट उर्सुला प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय शहरातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे. शाळेत हजारो विद्यार्थिनी शिक्षण घेतात. शाळेच्या आत मुलींचे वसतिगृहसुद्धा आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे काम सुरू असल्याने ते बंद आहे. त्यामुळे विद्यार्थिनी लहान प्रवेशद्वारातून ये-जा करतात. वर्दळीच्या रस्त्यापासून १० ते १५ फुटांच्या अंतरावर प्रवेशद्वार आहे. त्यामुळे पालकवर्ग मुलींना शाळेत सोडायला आल्यानंतर मुलींना मुख्य रस्ता ओलांडून जावे लागते. रस्त्यावर भरधाव वाहने जात असतात. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. विद्यार्थिनी रस्ता ओलांडत असताना पालकांच्या मनात भीती असते. विद्यार्थिनींना ऑटोचालक रस्त्याच्या बाजूला सोडून देतात. रस्त्यावर अनेक कॉफी हाऊस, नाश्त्याची दुकाने असल्यामुळे युवावर्गाची मोठी गर्दी असते. याचा त्रास रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थिनींना होतो. एखाद्या दिवशी मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर सुरक्षारक्षक ठेवणे किंवा वाहतूक पोलिसांच्या गस्तीची किंवा सुरक्षेची मागणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>>Rohit Pawar : “तुम्ही महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते, फक्त…”; राज ठाकरेंबाबत नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

ऑटोचालकांची गर्दी

व्हीसीए स्टेडियम किंवा या भागातून सीताबर्डी किंवा सदर भागात जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्यामुळे ऑटोचालकांची शाळेच्या समोरच मोठी गर्दी असते. प्रवासीसुद्धा शाळेसमोरच ऑटोची वाट बघत उभे असतात. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींचा रस्ता अडवला जातो. शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी रस्त्यावर विद्यार्थिनींची गर्दी असते.

शासकीय कार्यालयामुळे वर्दळ

सिव्हिल लाईनमध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत. मुख्य म्हणजे न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा याच रस्त्यावर आहे. त्यामुळे या भागात शासकीय नोकर आणि कार्यालयीन कामे करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन शाळा भरण्याच्या वेळी किंवा सुटण्याच्या वेळी वाहतूक नियंत्रित करण्याची गरज आहे.

“शाळा सुरू होण्याच्या आणि शाळा सुटण्याच्या वेळेवर वाहतूक पोलीस तैनात करण्याची गरज आहे. शाळेजवळ गतिरोधक बसवल्यास वाहनाचा वेग कमी होईल व विद्यार्थिनींना रस्ता ओलांडणे सोयीचे ठरेल.” – देवेंद्र बागल (कारचालक)

“सध्या वाहतूक कर्मचारी कमी असल्यामुळे पोलीस तैनात करण्यात आले नाहीत. परंतु, कोंडी झाल्यानंतर पोलीस तैनात केला जातो. विद्यार्थिनींना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलीस दक्षता घेतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो- नंदा मनगटे ,पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St ursula school student safety issue due to negligence of traffic police nagpur news adk 83 amy