नाशिक – जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी हे तालुके वगळता इतरत्र अद्याप पावसाचे स्वरुप रिमझिमच आहे. मागील २४ तासात मालेगाव तालुक्यातील काही भागात तासभर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणांमध्ये अतिशय संथपणे जलसाठा उंचावत होत आहे. दारणा धरण केवळ त्यास अपवाद ठरले. ७८ टक्के भरल्याने धरण परिचालन सुचीनुसार शनिवारी त्यातून ११०० क्युसेसचा विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये सध्या २४ हजार ७७० दशलक्ष घनफूट (३८ टक्के) जलसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पावसाने सरासरी न गाठल्यास पुढील वर्षाचे नियोजन गरजेचे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे मत

जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा लपंडाव सुरू आहे. हवामान विभागाने हंगामात अनेकदा अंदाज वर्तविले. पण, तसा पाऊस आजतागायत पडलेला नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासात मालेगाव तालुक्यात (१८.३ मिलीमीटर), बागलाण ६.३, मिलीमीटर, कळवण ९.५, नांदगाव ४.४, सुरगाणा २८.१, नाशिक १.१, दिंडोरी ६.६, इगतपुरी १८.६, पेठ ३४.२, निफाड २.५, सिन्नर २.२, येवला १.३, चांदवड २.८, त्र्यंबकेश्वर २३.५ आणि देवळा तालुक्यात ६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तीन, चार तालुक्यांचा अपवाद वगळता अनेक भागात निव्वळ शिडकावा होत आहे. पावसाअभावी अनेक भागात पेरण्याही होऊ शकलेल्या नाहीत. जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत सर्वसाधारणपणे ३९३.६ मिलीमीटर पाऊस पडतो. या वर्षी २४४ मिलीमीटर म्हणजे केवळ ६२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ६१२.१.१ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या दीड पट पाऊस झाला होता.

हेही वाचा >>> शहर स्वच्छता, कुंभमेळ्याच्या तयारीला प्राधान्य, नाशिक मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांचे प्रतिपादन

मालेगाव शहर व तालुक्याच्या काही भागात शुक्रवारी एक ते दीड तास मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. यंदाच्या हंगामात हा पहिलाच मोठा पाऊस ठरला. यावर्षी मालेगाव व आसपासच्या तालुक्यांमध्ये तब्बल तीन आठवडे उशिराने पाऊस दाखल झाला. उशिरा आलेला हा पाऊसही फारसा समाधानकारक नव्हता. अत्यल्प पावसावर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या उरकून घेतल्या. मात्र पावसाळी हंगामाचा दीड महिन्याचा कालावधी उलटल्यावरही अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. तसेच पेरणी झालेल्या ठिकाणी पुरेशा पावसाअभावी पिके करपू लागल्यामुळे आकाशाकडे नजरा लावून बसलेला बळीराजा विंवचनेत सापडल्याचे चित्र होते. पावसाची दीर्घ प्रतीक्षा लागून राहिली असतानाच मालेगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अनेक सखल भागात पाणी साचले होते. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरुप आले होते. हा पाऊस सर्वदूर नसला तरी आता तो येता झाल्याचे दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गंगापूरमध्ये ४७ टक्के, तीन धरणे अद्याप कोरडी

पावसाअभावी जुलै संपण्याच्या मार्गावर असताना धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही. ७५ टक्के भरल्याने दारणा धरणातून शुक्रवारी विसर्ग केला गेला असला तरी उर्वरित धरणांची स्थिती तशी नाही. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण (४७ टक्के), काश्यपी व गौतमी गोदावरी (प्रत्येकी २६ टक्के), आळंदी (११), पालखेड (३७), करंजवण (२८), वाघाड (२३), ओझरखेड आणि पुणेगाव (प्रत्येकी २६), दारणा (७८), भावली (८७), मुकणे (५४), वालदेवी (२३), कडवा (३२), नांदुरमध्यमेश्वर (३३), भोजापूर (१०), चणकापूर (४४), हरणबारी (६४), पुनद (५० टक्के) असा जलसाठा आहे. महत्वाची बाब म्हणजे पावसाळ्याचे दोन महिने उलटत असताना तिसगाव, माणिकपूंज आणि नागासाक्या ही धरणे कोरडीठाक आहेत. सद्यस्थितीत धरणांमध्ये २४ हजार ७७० दशलक्ष घनफूट म्हणजे ३८ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तो दुपटीहून अधिक म्हणजे ५३ हजार ४३२ दशलक्ष घनफूट (८१) टक्के होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small and big dams of nashik district having 43 percent less water compared to last year zws