पालघर: १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये पालघर पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पालघर पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या अगोदर कार्यालयीन सुधारणांच्या मोहिमेत पालघर पोलीस दल प्रथम आले होते.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात हा ७ कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये वेबसाईट, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोई सुविधा, आर्थिक व औद्यागिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी इत्यादी विषय आहेत.
पालघर जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करताना संकेतस्थळ अद्ययावत करून युजर फ्रेंडली बनवली, नागरिकांसाठी चॅट बॉक्स सुविधा, सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम, एआय अंतर्गत चॅटबोट, स्वच्छता मोहिम, तक्रार निवारण दिन, ई-ऑफिस कार्यप्रणाली, डिजिटल मॅनेजमेंट सिस्टम, कार्यालयीन कामकाजामध्ये एआय चा वापर, पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय अॅप्लीकेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.
या ७ कलमी कार्यक्रमाअंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेकडून १०० दिवसांचे मुल्यमापन करण्यात आले होते. त्यामध्ये पालघर पोलीस दलास १०० गुणांपैकी ९०.२९ गुण प्राप्त झाले आहेत. त्यामुळे १०० दिवसांच्या कार्यालयीन मुल्यमापनानंतर पोलीस विभागातून महाराष्टातील एकूण ३४ जिल्हा पोलीस दलामधून पालघर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या अगोदर देखील ५० दिवसांच्या कार्यालयीन मुल्यमापनामध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक मिळवला होता.
हा ७ कलमी कार्यक्रम हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवून यशस्वीरित्या राबविला आहे.
यापूर्वी देखील पालघर पोलीस अव्वल
राज्यात ७ जानेवारी ते १६ एप्रिल या कालावधीत १०० दिवसांची ‘कार्यालयीन सुधारणांची’ विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अधिकारी कर्मचारी यांच्या कामगिरीचे कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर (एआय), नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयांमधून पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. २७ फेब्रुवारी रोजी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले होते.