पालघर : दांडाखाडी गाव परिसरातील पारंपरिक स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व त्या भागातील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण न हटवल्याच्या निषेधार्थ गावातील एका मृत्यू झालेल्या नागरिकाचा अंत्यसंस्कार ग्रामपंचायत कार्यालय परिसरामध्ये करून आपला संताप व्यक्त केला. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दांडाखाडी गाव परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गावाची पारंपरिक असलेल्या एका ठरावीक जागेवर स्मशानभूमी आहे. अंत्यसंस्काराचे विधी गेल्या अनेक वर्षांपासून तेथे केले जातात. मात्र अलीकडच्या काळामध्ये या स्मशानभूमीवर जाणाऱ्या रस्त्यात एका व्यक्तीने भिंतीचे कुंपण घालून हा रस्ता बंदिस्त केल्यामुळे गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. तहसीलदार कार्यालयाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २० गुंठे सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याचे मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात म्हटले होते. त्याचबरोबर तहसीलदार यांच्याकडे या प्रकरणात झालेल्या सुनावणीत अतिक्रमण झाल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते.

या प्रकारानंतर पालघरचे तहसीलदार यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना पत्र लिहून हे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे व सरकारी जागा मोकळी करावी, असे आदेश दिले होते. त्यानंतरही ते हटवण्यात येत नसल्यामुळे दांडाखाडी गावातील नागरिकांचा रोष वाढतच गेला. आक्रमक झालेल्या दांडाखाडी येथील ग्रामस्थांनी मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीलगतच जाळून ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.

दांडाखाडी येथील बारी समाजाचे आशीष नारायण बारी या पन्नास वर्षे वयाच्या व्यक्तीच्या मृतदेहावर स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातील इमारतीलगतच अग्निसंस्कार करत स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत याच ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers cremated body in gram panchayat office premises against encroachment on road zws