-
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. युएईत झालेल्या स्पर्धेत मुंबईने दिल्लीवर मात केली. (सर्व फोटो सौजन्य – IPL)
-
IPL मध्ये लिलावामुळे अनेक खेळाडू दर एक-दोन हंगामांनंतर दुसऱ्या संघांकडून खेळताना दिसत असतात.
-
खुद्द मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही IPL मध्ये मुंबईकडून खेळण्याआधी डेक्कन चार्जर्सकडून खेळायचा.
-
आज आपण मुंबई इंडियन्सच्या संघातील अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत त्यांनी आतापर्यंत कधीही मुंबईसोडून दुसऱ्या संघाचं नेतृत्व केलेलं नाही.
-
६) मिचेल मॅक्लेनघन – न्यूझीलंडचा डावखुरा जलदगती गोलंदाज. आतापर्यंत ५६ सामन्यांमध्ये मॅक्लेनघनच्या नावावर ७१ बळींची नोंद आहे. २०२० च्या हंगामात मिचेलला ट्रेंट बोल्टमुळे संधी मिळाली नाही, पण गेल्या काही हंगामांपासून मॅक्लेनघन मुंबईसाठी महत्वाचा गोलंदाज म्हणून खेळतो आहे.
-
५) कृणाल पांड्या – २०१६ साली कृणालला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतलं. यानंतर मधल्या फळीतली आक्रमक फलंदाजी आणि कामचलाउ फिरकी यामुळे कृणाल हा मुंबईच्या संघाचा अविभाज्य हिस्सा झाला आहे.
-
४) हार्दिक पांड्या – २०१५ पासून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. अष्टपैलू गोलंदाज, उत्तम क्षेत्ररक्षक आणि मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करणारा खेळाडू या तीन गुणांमुळे हार्दिक आजही मुंबईचा महत्वाचा खेळाडू आहे.
-
३) जसप्रीत बुमराह – २०१३ साली बुमराहला मुंबईच्या संघात स्थान. यानंतर लसिथ मलिंगाच्या साथीने गोलंदाजीची कमान सांभाळणारा बुमराह हळुहळु मुंबईचा प्रमुख गोलंदाज बनला. २०२० च्या हंगामात मलिंगाच्या अनुपस्थितीत बुमराहने मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली.
-
२) कायरन पोलार्ड – पोलार्ड हा मुंबई इंडियन्स संघाचा आधारस्तंभ मानला जातो. आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये पोलार्डने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत अशक्यप्राय सामने मुंबईला जिंकवून दिले आहेत. याचसोबत पोलार्डने अनेकदा मुंबईला गोलंदाजीत महत्वाचे बळी मिळवून दिले आहेत.
-
१) लसिथ मलिंगा – मुंबईच्या गोलंदाजीचं ब्रम्हास्त्र म्हणून लसिथ मलिंगाची ओळख आतापर्यंत सर्वांना आहे. एका हंगामात मलिंगा मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सहभागी होता. यानंतर २०१९ मध्येही अंतिम सामन्यात मलिंगाने भेदक मारा करत रंजक सामन्यात मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईकडून १२२ सामने खेळलेल्या मलिंगाने आतापर्यंत १७० बळी घेत आपलं महत्व सिद्ध केलं आहे.

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा