-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदललं आहे. यापुढे हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने दिला जाणार आहे.
-
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
-
मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असं म्हटलं जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉकी संघाचा दबदबा तयार करण्यात ध्यानचंद यांचा मोठा वाटा होता.
-
१९२८, १९३२ आणि १९३६ अशा लागोपाठ ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात ध्यानचंद यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
-
याच कारणासाठी २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो.
-
या दिवशी वर्षभर विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू, प्रशिक्षक यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात येतो.
-
ध्यानचंद वयाच्या १६ व्या वर्षी लष्करात भरती झाले. लष्करात आल्यापासूनच त्यांचा ओढा हॉकी खेळण्याकडे होते. ध्यान सिंग हे सुरुवातीच्या दिवसांमध्ये रात्री भरपूर सराव करायचे. या कारणामुळे त्यावेळच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना चाँद असं नाव ठेवलं. अनेकदा रात्री आकाशात चंद्र आल्यानंतरही ध्यान सिंग यांचा सराव सुरु असायचा. यानंतर ध्यानसिंग हे ध्यानचंद म्हणून ओळखले जाऊ लागले.
-
१९२८ साली पार पडलेल्या अॅमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत ध्यानचंद हे सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले होते. या स्पर्धेत त्यांनी १४ गोल डागले. This is not a game of hockey, but magic. Dhyan Chand is, in fact, the magician of hockey, अशा शब्दात त्यावेळीच्या वर्तमानपत्रांनी ध्यानचंद यांच्या खेळाचं वर्णन केले होते.
-
आंतरराष्ट्रीय पातळीवर ध्यानचंद यांनी खूप नाव कमावलं. त्यांच्या जादुई खेळामुळे भारताने अनेक सामने जिंकले. परंतू या सर्वांमध्ये त्यांचा सर्वात आवडता सामना होता तो म्हणजे…१९३३ साली Beighton Cup मधील कलकत्ता कस्टम्स विरुद्ध झांशी हिरोज हा अंतिम सामना ध्यानचंद यांचा सर्वात आवडता सामना होता. अनेकदा मुलाखतींमध्ये ध्यानचंद या सामन्याचा उल्लेख करायचे.
-
१९३२ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने अमेरिकेवर २४-१ तर जपानवर ११-१ अशी मात केली. भारताच्या एकूण ३५ गोलपैकी ध्यानचंद यांनी १२ तर त्यांचे भाऊ रुप सिंग यांनी १३ गोल झळकावले होते. या स्पर्धेनंतर भारतीय हॉकीतली ही भावांची जोडी चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती.
-
एका सामन्यात ध्यानचंद यांना एकही गोल करता आला नाही. यानंतर त्यांनी पंचांची गोलपोस्टच्या साईजवरुन वाद घातला. सर्वाच आश्चर्याची गोष्ट म्हणजे तपासणी केली असतान त्या सामन्यात गोलपोस्टची साईज ही चुकीची असल्याचं लक्षात आलं. तत्कालीन आंतरराष्ट्रीय हॉकीच्या नियमांप्रमाणे त्या सामन्यातला गोलपोस्ट उभारण्यात आला नव्हता.
-
१९३६ साली बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना झाल्यानंतर, उपस्थित प्रेक्षक इतर सामन्यांची मैदानं सोडून भारतीय हॉकी संघाचा सामना पाहण्यासाठी गर्दी करायचे. त्यावेळी एका स्थानिक जर्मन वृत्तपत्राने ध्यानचंद यांच्या करिष्म्याचं वृत्तांकन काहीशा अशा शब्दांत केलं होतं…‘The Olympic complex now has a magic show too.’ भारतीय संघाचा सामना असताना बर्लिन शहरात…“Visit the hockey stadium to watch the Indian magician Dhyan Chand in action.” असा संदेश लिहीलेली पोस्टर्स लागायची.
-
बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत ध्यानचंद यांचा खेळ पाहून हुकूमशहा हिटलरने ध्यानचंद यांना जर्मनीचं नागरिकत्व आणि सैन्यात मोठं पद बहाल केलं होतं. त्यावेळी ध्यानचंद यांनी तितक्याच करारी पद्धतीने हिटलरला नकार दर्शवला होता.
-
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन आणि ध्यानचंद यांची १९३५ साली Adelaide येथे भेट झाली होती. ध्यानचंद यांची भेट झाल्यानंतर..आम्ही क्रिकेटमध्ये धावा करतो तसं ध्यानचंद हॉकीत गोल करतात अशा शब्दांत ब्रॅडमन यांनी ध्यानचंद यांचं कौतुक केलं.
-
१९२६ ते १९४८ या आपल्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत ध्यानचंद यांनी ४०० पेक्षा जास्त गोल डागले. नेदरलँडमधील एका अधिकाऱ्यांनी ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकमध्ये कोणती जादू तर नाही ना हे पाहण्यासाठी एकदा त्यांची स्टिक मोडली होती. (फोटो सौजन्य – http://www.bharatiyahockey.org)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या