-
अनेकदा एखादा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं की प्रत्येकासमोर अडचणींचा डोंगर उभा असतो. पण तुमच्याकडे जिद्द आणि इच्छा असेल तर तुम्ही त्यावर मात करत यशाला गवसणी घालू शकता. सोलापूरच्या स्वाती ठोंगे यांनी हे सिद्ध केलं. एकेकाळी स्वाती ठोंगे यांच्यापुढे आयुष्यात नेमकं काय करायचं हा प्रश्न होता. पण त्यांनी हार मानली नाही आणि व्यवसाय करायचं ठरवलं. स्वाती ठोंगे आज लाखोंची उलाढाल करत आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल आज जाणून घेऊयात. जोश टॉक्सला दिलेल्या मुलाखतीत स्वाती ठोंगे यांनी आपला खडतस प्रवास उलगडला होता.
-
स्वाती ठोंगे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी उपळाई येथील रहिवासी आहेत.
-
त्यांचं माहेरचं कुटुंब फार मोठं होतं. कुटुंबात जवळपासस ५२ लोक होते. वडिलांना बहिण नव्हती आणि मुलगी असल्याने त्यांचे खूप लाड होत होते. त्यांना हवं ते सर्व काही मिळत होतं.
-
स्वाती यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. मुलींनी पुढे शिकू नये असं कुटुंबाचं मत असल्याने त्यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही,
-
स्वाती यांना फार आधीपासून व्यवसायिक होण्याची इच्छा होती. पण त्याचं ते स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही.
-
२००६ मध्ये स्वाती यांचं लग्न झालं. पण त्यांच्यावर काळाचा घात झाला आणि २०१० मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यावेळी स्वाती यांची मुलगी फक्त साडे तीन महिन्यांची आणि मुलगा पावणे दोन वर्षांचा होता.
-
माहेरचं मोठं कुटुंब असल्याने सासरीही तसंच कुटुंब असावं अशी स्वाती यांची इच्छा होती. सासरच्या लोकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना तो पाठिंबा मिळाला नाही. स्वाती यांच्या कुटुंबीयांनी हात मागे घेतले होते. तुझी मुलं आणि तू काय ते बघ असं सांगत त्यांना कोणतीही मदत करण्यास नकार दिला.
-
स्वाती यांच्या वडिलांनी त्यांना आपल्याकडे येऊन राहण्यास सांगितलं. पण स्वाती यांनी नकार दिला. मला जर काही करायचं असेल तर स्वतची ओळख निर्माण करायची असल्याचं त्यांनी सांगितलं.
-
पण परिस्थिती इतकी वाईट होती की, स्वाती यांना रोज रात्री रडू येत असे. नेमकं काय करायचं हे त्यांना समजत नव्हतं. त्यांना फक्त आपला नाही तर मुलांचाही विचार करायचा होता.
-
स्वाती यांच्या मावस बहिणीने त्यांना बचत मंडळात जाऊन काम करण्याचा सल्ला दिला. पण यावेळीही त्यांच्या कुटुंबाने बचत गटात जाऊन काम करायचं असेल तर आमच्यापासून वेगळं राहावं लागेल असं सांगून टाकलं. स्वाती यांनी तो धाडसी निर्णय घेतला. कारण आपल्या मुलांनी कोणासमोरही मदतीसाठी हात पसरु नये अशी त्यांची इच्छा होती.
-
कारण स्वाती यांच्या मुलाने चुलत्याकडून पाच रुपये घेतले होते. त्यावेळी चुलत्याने वारंवार त्याच्याकडे ते पाच रुपये मागत आपण उपकार केल्याची जाणीव करुन दिली होती. त्यावेळी स्वाती यांनी पाच रुपयासाठी एवढं असेल तर पुढे काय होईल याचा विचार केला. मुलांची शिक्षण त्याचं भविष्य याचा विचार स्वाती यांनी केला.
-
स्वाती यांनी त्यानंतर बचत गटात जाण्याचं पक्क केलं.
-
बचत गटातील त्यांचं काम पाहून त्यांना मार्केटिंगची जबाबदारी देण्यात आली. पण स्वाती यांच्या मनात कुठेतरी व्यवसाय करण्याची इच्छा जागी होती.
-
स्वाती यांनी सोलापुरात कृषी स्टॉलमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. आई-वडिलांनी आर्थिक मदत देऊ केली होती. पण आपल्याला याची सवय लागेल म्हणून ते घेण्यास त्यांनी नकार दिला होता. म्हणून स्वाती यांनी त्यांच्या मॅडमकडून दोन हजार रुपये उधार घेतले.
-
स्वाती यांनी तिथे चहाचा स्टॉल लावला. स्वाती यांनी त्यावेळी सात हजार रुपये कमावले. स्वाती यांना आपल्या या पहिल्या व्यवसायात पाच हजारांचा नफा झाला.
-
स्वाती यांनी मुंबईतील महालक्ष्मी येथे बचत गटातून पाठवण्यात आलं होतं. बार्शीमधून सहा बचत गट येणार होते. स्वाती त्यांच्या मार्गदर्शक म्हणून येणार होत्या. स्वाती यांनी येताना मुंबईला येऊ शकत नाहीत अशा महिलांकडून वस्तू विकत घेतल्या. पण त्यांनी महिलांना आपल्याकडे आत्ता तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत, मुंबईला माल विकून परत येईन तेव्हा पैसे देईन, विश्वास असेल तर द्या असं सांगितलं. स्वाती यांनी ६० हजाराचा माल खरेदी केला होता. मुंबईत त्यांनी तोच माल १ लाख २० हजारात विकला. ही त्यांच्या व्यवसायाची दुसरी पायरी होती.
-
पण स्वाती यांना आपलं स्वत:चं असं काहीतरी करायचं होतं. त्यांनी आपल्या मॅडमकडे व्यवसाय सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. आपण उडीद आणि शाबू पापडांचा व्यवसाय करण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं, स्वाती यांना मार्केटची बऱ्यापैकी माहिती मिळाल्याने लोकांना काय हवं आहे याची त्यांना चांगलीच माहिती मिळाली होती. लोकांची आवड लक्षात घेऊन व्यवसाय केला तर आपण कधीच तोट्यात जाणार नाही हे त्यांना चांगलंच कळलं होतं.
-
स्वाती यांनी बचत गटातील दोन महिलांना सोबत घेऊन उडीद आणि शाबू पापडांचा व्यवसाय सुरु केला.
-
पापड कसे तयार करायचे याचं प्रशिक्षणही स्वाती यांनीच दिलं.
-
त्याचवेळी स्वाती यांनी केरळला जाण्याची संधी मिळाली. तिथे १० राज्यांचे स्टॉल लागणार होते आणि त्यात महाराष्ट्रही होता. यासाठी बार्शी तालुक्यातून फक्त पाच महिला जाणार होत्या. त्यात स्वाती यांचं नाव होतं, सोबतंच गटाचं नेतृत्त्वही त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं.
-
स्वाती यांनी बार्शी आणि उपळाईच्या बाहेर प्रवासच केला नसल्याने केरळ त्यांच्यासाठी नवीन होतं. तेथील भाषा, लोकांची आवड याबद्दल स्वाती यांना काहीच कल्पना नव्हती.
-
स्वाती आणि त्यांच्या गटाने तिथे पुरणपोळीचा स्टॉल लावला होता. पण दोन दिवस त्यांच्या स्टॉलकडे कोणी फिरकलंही नाही. यामुळे स्वाती यांनी तिथे फिरुन कोणत्या स्टॉलवर लोकांची गर्दी जास्त आहे याचं निरीक्षण केलं असता नॉनव्हेजला लोकांची पसंती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यावेळी त्यांनी आपला कोल्हापूरी रस्सा आणि मटण सुरु करायचं ठरवलं.
-
यामुळे पहिले दोन दिवस काहीच व्यवसाय न झालेल्या स्वाती यांनी पुढील आठ दिवसात १ लाख ६० हजार रुपये कमावले.
-
केरळहून परतल्यानंतर स्वाती आणि त्यांची मैत्रीण रोहिणी यांना आपण चांगलं मार्केटिंग करु शकतो हे लक्षात आलं. गावात अशा अनेक महिला आहेत ज्या बाहेर जाऊन आपल्या पदार्थाचं मार्केटिंग करु शकत नाहीत. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करु शकतो का असा विचार त्यांच्या डोक्यात आला. आपल्याप्रमाणे इतर महिलांची कुचंबणा होऊ नये असंही त्यांना वाटत होतं.
-
यानंतर स्वाती आणि त्यांची मैत्रीण रोहिणी यांनी स्वदेशी मार्केटिंग कंपनी सुरु केली. यामध्ये त्या फक्त बचत गटातील महिलांच्या वस्तू खरेदी करतात.
-
हे पदार्थ, वस्तू बार्शी, सोलापूर, मुंबई, पुणे अशा ठिकाणी पाठवले जातात.
-
स्वाती यांच्या मार्फत सध्या अनेक महिला घरी बसून महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमवत आहेत.
-
स्वाती यांना याचा फार मोठा अभिमान वाटतो. आपल्याकडे एक रुपयाही नसताना, कोणीही पाठीशी नसताना आपण उभे राहिलो आपण यशस्वी झाल्याचा त्यांना अभिमान आहे. महिलांनी जर ठरवलं तर त्या स्वत: व्यवसाय करुन खूप पैसा कमावू शकतात असं त्या सांगतात.
-
एकेकाळी २००० हजार रुपये उधार घेऊन आपला पहिला व्यवसाय सुरु कऱणाऱ्या स्वाती आज महिन्याला ५० हजाराहून जास्त पैसे कमावत आहेत.
-
स्वत: व्यवसाय करा, स्वत: मालक व्हा, स्वत: नोकर व्हा, स्वत: कामगार व्हा असा यशाचा मंत्र स्वाती यांनी दिला आहे.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक