पुणे : ‘विस्थापन, मूलभूत सुविधा, आर्थिक प्रश्न, आरोग्य, शिक्षण हे आदिवासी समाजासमोरील मुख्य प्रश्न आहेत. त्यांच्यासमोर आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. सिकल सेल, ॲनिमिया यांसारख्या समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो आहेे.’ असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.
‘बहुरंग’तर्फे घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित १८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी, ग. श. पंडित या वेळी उपस्थित होते. यावेळी आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक वैशिष्ट्यांची, समस्यांची मांडणी करणारे लघुपट दाखविण्यात आले. तसेच महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपट निर्मात्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यासागर म्हणाले, ‘आदिवासींना अनेक आव्हानांचा सामना करत मुख्य प्रवाहात वावरावे लागते. त्यांच्यासमोर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या आहेत. चांगल्या आरोग्यसेवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासह आदिवासींना वाटणारा संकोच, भीती कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.’
‘मुख्य प्रवाहातील समाजाचा आदिवासींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. आदिवासींकडे बघताना समाजाच्या संवेदना, जाणिवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी समाज आणि त्यांची संस्कृती टिकण्यासाठी मदत होईल. विद्यापीठांचे भाषा विभाग, ललित कला केंद्रे यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, बोलीभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत,’ अशी अपेक्षा विद्यासागर यांनी व्यक्त केली.
‘आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याविषयी दोन प्रवाह आहेत. मुख्य प्रवाहात आल्यास त्यांची संस्कृती टिकणार नाही असा एक, तर समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर त्यांचा विकास कसा होणार असा दुसरा मतप्रवाह आहे. आदिवासींच्या प्रश्नांबाबत समाजात दुहेरी मानसिकता निर्माण झाली आहे,’ असेही विद्यासागर म्हणाले.
ग. श. पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. कुंडलिक केदारी यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण देशमुख यांनी सूत्रसंचालन, तर धीरज केदारी यांनी आभार मानले.