पुणे जिल्ह्यातील पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे लोणावळ्यातील भुशी धऱण काठोकाठ भरुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील पर्यटकांना वेध लागतात ते पुण्यातील अनेक धरणांना भेटी देण्याचे. त्यापैकीच एक महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणजे भुशी धरण. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल होताना दिसतात. पावसासोबतच या ठिकाणी धुक्याचे प्रमाण देखील बरेच असल्याने मुंबईकर आणि पुणेकरांची या ठिकाणी दरवर्षी गर्दी पहायला मिळते.
पुणे आणि मुंबईचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी धरण काठोकाठ भरण्याची वाट पाहत असतात. शुक्रवारपासून मुंबई आणि पुणे परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भुशी धरण परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरण ओसंडून वाहू लागले आहे. जोरदार पावसाचा फटका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूकीला बसला असून वाहतूक संथगतीने सुरू आहे. मात्र त्याचवेळी भुशी धरण भरल्याने पर्यटक पावसाचा आनंद लुटण्याबरोबर धरणाच्या सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणासाठ्यात वाढ झाली. सोमवारी सकाळपासून धरण काठोकाठ भरुन वाहू लागले आहे.
शनिवार, रविवार सलग सुटी असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भुशी धरणावर फेरफटका मारण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये धरणाच्या पायर्यांवर बसून पावसात चिंब भिजण्याचा आनंद, तसेच फोटोची क्रेझ देखील पाहायला मिळते. धरणाच्या पाणीपातळीत झालेली वाढ स्थानिक विक्रेत्यांना सुखावणारी आहे. पावसाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने स्वतः ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.