पुणे : मराठी टिकण्यासाठी ती ज्ञानभाषा व्हायला हवी. मात्र, मुंबई-पुण्यासह सर्वत्र मराठी शाळा बंद पडत आहेत हे वेदनादायी आहे. मराठी टिकवण्यासाठी मराठी शाळा टिकवण्यासह त्या उत्तम पद्धतीने चालवाव्या लागतील, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सरकारला खडे बोल सुनावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात डॉ. माशेलकर बोलत होते. केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सुशील जाधव, विशाल चोरडिया, लेखक दिग्दर्शक चंद्रप्रकाश या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ५१ वी डी.लिट. पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

हेही वाचा…लोकसभा निकालानंतर ‘ईव्हीएम’ला दोष देत बसलो नाही, अजित पवार यांची विरोधकांवर टीका

u

डॉ. माशेलकर म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाने वाचनाची संस्कृती वृद्धिंगत केली आहे. नव्या पिढीने पुस्तक हाती घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे. भारत आता बेडूक उडी नाही, तर हनुमान उडी घेत आहे. अनेक महोत्सव होणाऱ्या पुण्यात आता पुणे पुस्तक महोत्सवाची वेगळी ओळख निर्माण होत आहे. पुण्याचे अनुकरण देश करतो. पुण्यातील प्रत्येक घर ज्ञानमंदिर झाल्यास पुणे ज्ञाननगरी होईल. ही हनुमान उडी मारण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे

पुणे पुस्तक महोत्सव ही पुण्याची आणखी एक ओळख, नवे आकर्षण निर्माण झाले आहे. पुण्याच्या महोत्सवाची चर्चा दिल्लीत झाली. हे पुणेकर म्हणून अभिमानास्पद आहे. पुढील वर्षी अधिक मोठा आणि अधिक कालावधीचा महोत्सव करावा लागणार आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. समाजाला जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मात्र पुस्तकांनी समाजाला जोडण्याचा देशातील अनोखा प्रयत्न पुण्यात झाला आहे. पुणेकरांनीच या महोत्सवाचे ब्रँड ॲम्बेसिडर झाले पाहिजे. पुणे नेहमीच देशाचे नेतृत्व करते. आता एनबीटीचे कार्यालय पुण्यात होत आहे. या कार्यालयात सारे काही विनाशुल्क असेल, असे युवराज मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा…थंडीचा कडाका सरला, आता हलक्या पावसाची चिन्हे

दोन हजार नव्या ग्रंथालयांना मान्यता

यंदाचा महोत्सव गेल्यावर्षीच्या तुलनेत तिप्पट मोठा होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तो चौपट, पाचपट मोठा झाला. ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या या उपक्रमाच्या धर्तीवर ‘शांतता… महाराष्ट्र पुस्तक वाचत आहे’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. दोन हजार नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्मीळ ग्रंथांचे टप्प्याटप्प्याने डिजिटायझेशन करण्यात येत आहे, असे पाटील यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune dr raghunath mashelkar criticized government emphasizing need to maintain marathi schools pune print news ccp 14 sud 02