प्रिय धनुभाऊ, सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. ते यासाठी की तुमच्यावर होणारे आरोप व राजीनाम्याच्या चर्चेमुळे लाडक्या लेकीच्या मनावर वाईट परिणाम होतोय या ‘नाजूक’ व भावनाप्रधान विषयाला तोंड फोडल्याबद्दल. आजवर आम्ही हेच समजत होतो की भावनेचे राजकारण म्हणजे धर्माचे राजकारण. पण याला असाही पैलू आहे याची जाणीव आपण समस्त माध्यमांना करून दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच. अगदी परवापर्यंत तुमची भावनिक (आर्थिक नाही) गुंतवणूक कराडमध्ये असल्याचे आम्हाला ठाऊक होते. प्रत्यक्षात ती लेकीमध्ये आहे याची जाणीव यानिमित्ताने तमाम राज्याला झाली, हेही नसे थोडके.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमचे हे वक्तव्य प्रसारित झाल्यापासून राज्यभरातील समुपदेशक कामाला लागलेत म्हणे! मंत्र्यांनी पद सोडल्यावर त्यांच्या मुलांच्या अभ्यासावर काय परिणाम होतो? त्यांच्या भावनांना ठेच कशी पोहोचते? बाबा आता मंत्री राहिले नाहीत म्हणून ते पुस्तके फेकून देतात काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या अभ्यासातून यथावकाश मिळतील व भविष्यात समस्त सत्ताधाऱ्यांना त्याआधारे मुलांच्या जडणघडणीकडे लक्ष देता येईल. समुपदेशकांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेल्या अभ्यासामुळे तुम्ही सर्व मंत्र्यांसाठी पथदर्शी ठराल अशी आशा आता निर्माण झाली आहे. तिकडे विरोधक म्हणताहेत, त्या देशमुखांच्या मुलीच्या मनावर झालेल्या परिणामाचे काय? घरातला कर्ता गमावल्याने त्यांचे शिक्षण सुटले त्याचे काय? त्याचा विचार कुणी करायचा? असल्या प्रश्नांना तुम्ही महत्त्व देण्याचे काहीच कारण नाही. या प्रश्नांवर विचार करण्याची जबाबदारी कराड व त्याच्या कंपूची. तुमची नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबापुरता विचार करणे केव्हाही योग्य.

प्राचीन काळी राज्याभिषेक व्हायच्या आधी राजपुत्राला प्रशिक्षण दिले जायचे. राज्यकारभार करताना अजिबात हळवे व्हायचे नाही याचे. कारण त्याचा परिणाम करवसुलीवर व्हायला नको म्हणून. आता तुम्ही राज्यकर्ते असले तरी करवसुलीचे (खंडणी नाही) काम तुमच्याकडे नाही. त्यामुळे हळवे होत स्वत:चा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे व तोच तुम्ही काल वापरला. तुमचे ‘माजी’ पट्टशिष्य कराडच्या कारनाम्यामुळे केवळ बीडच नव्हे तर राज्यातील मुली व महिलांच्या मनावर काय परिणाम झाला याचाही विचार करण्याची तुम्हाला काहीएक गरज नाही. जो करेल तो भरेल या न्यायाने ते शिष्य त्यांचे बघून घेतील. तुम्ही मात्र स्वत:ला कुटुंबापुरते मर्यादित ठेवले हेच योग्य. जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला (खून वगैरे नाही) मंत्रीच जबाबदार अशी (वाईट) प्रथाच अलीकडे सुरू झाली आहे. रोज टीव्हीवर झळकणाऱ्या दोन-तीन ‘ताया’ त्याला बळ देताना दिसताहेत. हे राज्याच्या हिताचे नाही. या घातक प्रथेला कधी कठोर शब्दात तर कधी भावनाप्रधान होत विरोध करण्याचे महत्कार्य तुम्ही सुरूच ठेवावे हीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. ती तुम्हाला बरोबर समजली असल्याचे काल दिसलेच.

आजच्या काळात मंत्री होणे किती कठीण आहे याची कल्पना या कोल्हेकुई करणाऱ्यांना नाही. अतिशय कष्टाने मिळवलेले हे पद कुणा ऐऱ्यागैऱ्याच्या मागणीवरून झटकन सोडून देणे कपाळमोक्ष करून घेण्यासारखेच. त्यामुळे ती चूक तुम्ही कधीच करणार नाही याची खात्री आम्हाला आहेच. आरोपप्रत्यारोपाचा सामना करणे तुमच्यासाठी वंशपरंपरेने चालत आलेले काम. त्यामुळे हा सामना तुम्ही जिंकालच असा विश्वास आहे सर्वांना. लेकीची काळजी तेवढी घ्या. बाकीचे सांभाळून घ्यायला दादा आहेत की!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma politics of religion investment karad minister dhanjay munde amy