अतुल सुलाखे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस विसर्जित करणे अनेक कारणांनी अशक्य आहे याची जाणीव सर्वाना झाली. त्यानंतर बहुतेक नेत्यांनी गांधीजींच्या विचारांशी नाळ कायम कशी राहील यावर मंथन सुरू केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करावी आणि तिचे ‘लोकसेवक संघात रूपांतर करावे,’ अशी गांधीजींची इच्छा होती. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस आपोआप विसर्जित होईल असे नेहरूंचे मत होते.

नेहरूंची हे मत सहसा चर्चेत नसते. देशाचा पंतप्रधान आपल्याच पक्षाचे अस्तित्व कसे संपेल यावर मत मांडत होता. त्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चामधे सहभागी होत होता. होणाऱ्या निर्णयांच्या अंमलबजावणीला सहकार्य करत होता. ही अत्यंत अलौकिक घटना म्हणायला हवी.

तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान असल्याशिवाय हे घडत नाही. त्यामुळेच हुकूमशहा होण्यासाठी संपूर्ण परिस्थिती अनुकूल असताना नेहरूंनी लोकशाही तत्त्वांना हरताळ फासला नाही. कारण देशाचे प्रथम पंतप्रधान होण्यापूर्वी ते द्वितीय सत्याग्रही होते आणि ते ही भूमिका केव्हाच विसरले नाहीत.

याच वेळी गांधीजींचे विधायक कार्य आणि राजकीय सत्ता यांच्यात समन्वय साधण्यासाठी काँग्रेसमधील विधायक कार्यकर्त्यांचा एक गट १९४७ पूर्वीच प्रयत्न करत होता. स्व. शंकरराव देव हे या गटाचे नेते होते. स्वातंत्र्य लढय़ाची खरी ताकद गांधीजींचे विधायक कार्य होती. स्वातंत्र्योत्तर भारताची उभारणी विधायक कार्याच्या पायावर व्हावी अशी त्यांची भूमिका होती. अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये विधायक कार्यासाठी म्हणून एक खाते सुरू केले. त्याच्या मंत्रीपदी स्व. रघुनाथराव धोत्रे यांना नेमण्यात आले. हे धोत्रे म्हणजे विनोबांचे बालमित्र आणि सहकारी होते.

यात खादी, ग्रामोद्योग, मूलोद्योग, मूलोद्योग शिक्षण, हिंदूस्तानी प्रचार, साक्षरता प्रचार, हरिजन सेवा आदींचा समावेश होता. यानुसार विविध उपक्रम आखण्यात आले. ती माहिती प्रांतिक समित्यांना देण्यात आली.

केंद्रीय समितीची पहिली बैठक डिसेंबर १९४७मध्ये महात्मा गांधींसोबत झाली. बापू तेव्हा दिल्लीमधील हरिजन वस्तीमध्ये राहात होते. विधायक कार्याचा हा आरंभ सुयोग्य होता. तथापि नंतर लगेचच गांधीजींची हत्या झाली आणि समाजमनातील हिंसेचा स्फोट झाला. कोणत्याही समस्येवर हिंसक अभिव्यक्ती दिसू लागली. या संकटामुळे प्रमुख नेते हादरले. अशा पेचातून बाहेर पडण्यासाठी विनोबा समर्थ आहेत याची या नेत्यांना खात्री होती.

या परिस्थितीमधून कसा मार्ग काढायचा यावर चिंतन करण्यासाठी म्हणून १३ ते १५ मार्च १९४८ या काळात विधायक कार्यकर्त्यांचे एक संमेलन सेवाग्राममध्ये झाले. त्याचे संयोजन धोत्रे यांनी केले आणि अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र प्रसाद होते. ५०० कार्यकर्त्यांच्या या संमेलनाला काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

या संमेलनाचा मूळ हिंदी वृत्तांत आणि त्याचा इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे. तो मराठीमध्ये आला नसावा. तथापि गांधी विचार आणि त्यावर मातब्बर नेत्यांचे चिंतन बिकट परिस्थितीत कायमच मार्गदर्शन करेल याची खात्री करून देणारे असे ते चिंतन आहे.

अशा बिकट परिस्थितीतून काँग्रेस बाहेर पडली ती भूदान यज्ञामुळे. तसेच या चिंतनातून नव समाजाच्या निर्मितीची प्रक्रियाही सुरू झाली.

jayjagat24@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyog bhoodan movement save bhoodan movement from dire circumstances zws