निसर्ग हा मानवी जीवन सुखकर करणारा आहे हे समजून घेऊन आपल्या पूर्वजांनी मोठय़ा कल्पकतेने सण-उत्सव, व्रतवैकल्ये यांची आखणी केल्याचे दिसून येते. या सणांच्या निमित्ताने निसर्ग आणि निसर्गातील विविध घटक म्हणजेच पाणी, फुले, पाने, पशू, पक्षी, नदी, समुद्र यांचे पूजन करायची प्रथा दिसून येते. उदा. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने समुद्राचे, व्रतवैकल्यांच्या निमित्ताने औषधी वनस्पती, वृक्ष, नवधान्याचे स्वागत करणारी नवरात्री इत्यादी आपले जीवन सुखकर करणाऱ्या प्रत्येक घटकाचे सण-उत्सवाच्या निमित्ताने स्मरण करायचे, पूजन करायचे आणि कृतज्ञता व्यक्त करायची अशी शिकवण अपली संस्कृती देते. सण-उत्सवांच्या निमित्ताने आनंदात आपस्वकीयांबरोबर काही काळ घालवताना इतरांना उपद्रव होणार नाही, कोणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी आपोआपच घेतली जायची.
बदलत्या काळाबरोबर आयुष्य जगण्याचे, यातील आनंद लुटण्याचे संदर्भही बदलत गेले. सण आनंदाने साजरे करण्यापेक्षा ‘सेलिब्रेट’ करण्याकडे कल वाढत गेला. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला साजरा होणारा होळी पौर्णिमेचा सणही याला अपवाद नाही. खरेतर पूर्वी अंगणात होळी प्रज्वलित करण्यासाठी वाळलेल्या फांद्या, झावळय़ा, टाकून दिलेल्या लाकडी फळय़ा आदी अनावश्यक गोष्टी वापरल्या जायच्या. पण बदलत्या काळात हे नियम मागे पडले, कारण आपली होळी जास्तीतजास्त मोठी आणि जास्त वेळ कशी राहील याचीच स्पर्धा निर्माण होऊ लागली. धुळवडीच्या निमित्ताने हलक्याफुलक्या वातावरणात रंग खेळले जायचे. जाणाऱ्या-येणाऱ्याला उपद्रव होईल, कोणाला इजा होणार नाही याची काळजी घेतली जायची.
गेल्या काही वर्षांत धूलिवंदनाच्या आधी आणि नंतर रासायनिक रंगाच्या वापराने झालेले दुष्परिणाम आणि फुगे किंवा पिशव्या मारण्याने झालेल्या दुखापतीच्या घटनाच वाचायला मिळतात. आजच्या तरुण पिढीला आणि विशेषत: विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक होळी, धूलिवंदन कसे साजरे करावे याचे मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच संस्थेतर्फे आयोजित केल्या जातात.
ठाण्यातील १५ शाळांनी यंदा नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा आपल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. ठाण्यातील ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाची शाळा, टी. जे. हायस्कूल, शिवसमर्थ विद्यालय, भारतरत्न इंदिरा गांधी विद्यालय, यशोधन मराठी हायस्कूल आदी शाळांचा यात समावेश आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर आदी भागांतील ६० ते ७० शाळांनी पर्यावरण दक्षता मंचतर्फे आयोजित अशी कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आवर्जून आयोजली होती. ठाण्यातील विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने आपल्या विशेष मुलांसाठीही कार्यशाळा ठेवली होती.रेल्वे पोलीस फोर्स डोंबिवली विभागातर्फे गेली दोन वष्रे रेल्वेलाइनजवळील वस्त्यांमधील मुलांसाठी जनजागृती कार्यशाळा आयोजित केली जाते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाण्याने भरलेल्या पिशव्या, फुगे मारल्याने गंभीर दुखापती होतात. या मुलांमध्ये या दृष्टीने जागृती व्हावी म्हणून कार्यशाळा आयोजित केली जाते. पर्यावरण दक्षता मंचतर्फे डोंबिवली पश्चिम भागातील रेल्वे लाइनजवळील वस्तीत अशी कार्यशाळा ४ मार्च रोजी आयोजिण्यात आली होती. या मुलांना अशा तऱ्हेने फुगे फेकण्याचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले, रासायनिक रंगांच्या घातक परिणामांची माहिती देण्यात आली. कार्यशाळेमध्ये संवादामधून सांगताना रासायनिक रंग, प्लॅस्टिकच्या पिशव्या, फुगे कसे घातक आहेत ते सांगितले जाते. त्यांना पालक, बीट, कोथिंबीर, पुदिना किंवा अस्टर, झेंडू, शेवंती, गुलाब यांच्यापासून रंग तयार करणे सुलभ व पर्यावरणपूरक आहे ते समजावले जाते. अगदी चहा, कॉफी पाण्यात उकळून थंड झाल्यावर रंगीत पाणी म्हणून वापरता येते. पालक, कोथिंबीर, पुदिना यांच्या पानांचा लगदा पाण्यात टाकून त्यांचा गाळ केल्यास हिरवा रंग मिळतो.. अशा सोप्या कृती दाखविल्या जातात. रायायनिक रंगाचे दुष्परिणाम (निळा रंग- त्वचारोग, कॉपर- डोळे, त्वचा, श्वसन यंत्रणा आदी, हिरवा रंग- डोळय़ात अ‍ॅलर्जी, खाज येणे, सुजणे आदी) सांगितले जातात. मुलांना नैसर्गिक रंग करण्यातही बराच उत्साह असतो. तेही काही पर्याय सुचवतात. त्यामुळे गरज आहे पालक, शिक्षक, शाळा यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याची, त्यांना मदत करण्याची. मुले घरात रंग करू पाहतील, थोडा पसारा होईल, पण आपण त्यांना मदत केली, तर हळूहळू बदल निश्चित होईल. शाळेतही अशा तऱ्हेने काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणमित्र चषक देऊन वा फळय़ावर अभिनंदनपर नाव लिहून उत्तेजन दिल्यास ती जोमाने काम करतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environment festival