पालिका शहर अभियंता विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे डोंबिवली, कल्याण शहरांमधील खड्डे भरणीची कामे प्राधान्याने पूर्ण केली जात नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालक, प्रवाशांबरोबर सामाजिक संस्थांनी पालिका बांधकामाच्या कारभारा विषयी नाराजी व्यक्त करत स्वताहून पुढाकार घेत शहरातील खड्डे भरणीच्या कामास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात रिक्षा चालकांनी पुढाकार घेत शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे भरले. काही ठिकाणी नागरिकांनी पुढाकार घेत खड्डे भरले आहेत. शहरातील खड्ड्यांची दुरवस्था आणि नागरिकांचे होणारे हाल पाहून मानवी हक्कासाठी लढणाऱ्या कल्याण मधील मानवी हक्क फाऊंडेशन संस्थेने कल्याण पूर्व भागात खड्डे भरण्याचा उपक्रम राबविला. पूर्व भागातील विजयनगर भागातील रस्त्यांवरील खड्डे मानवी हक्क फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय शिर्के यांच्या पुढाकाराने बुजविण्यात आले. संस्थेचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते. संस्थेने खडी, माती परिसरातून स्वखर्चाने आणून खड्डे भरणीची कामे केली. रिक्षा चालक, प्रवाशांना संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमात फाऊंडेशनचे मुख्य सचिव रामचंद्र मोहिते, सचिव संतोष भंडारे, विकी भोईर, अरुणा पाटील, रमाकांत चव्हाण, दीपक कुंभार, वीरेंद्र मिश्रा, वैभव कांबळे, प्रकाश कांबळे, पी. के. मगर, सी. पी. गुरव सहभागी झाले होते.

पालिकेकडून खड्डे भरणीची कामे सुरू असली तरी ही कामे वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही. या कालावधीत प्रवाशांना, वाहन चालकांना खूप त्रास होण्याची शक्यता आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे मानवी हक्क संस्थेने खड्डे भरण्याचा उपक्रम सुरू केला आहे. पाऊस कमी होईल त्याप्रमाणे इतर भागातील खड्डे भरणीची कामे केली जातील, असे अध्यक्ष संजय शिर्के यांनी सांगितले.

आमदार भोईरांची मागणी

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नोकरदारांबरोबर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसना या खड्ड्याचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांना खड्ड्यांमुळे वेळेत शाळेत, घरी पोहचता येत नाही. त्यामुळे पावसाने थोडी उघडीप दिल्याने खड्डे भरणीची कामे तात्काळ सुरू करा, अशी मागणी कल्याण पश्चिमचे आ. विश्वनाथ भोईर यांनी पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेऊन केली.
आयुक्त नवीन आहेत. ते त्यांच्या परीने प्रयत्न करून खड्डे भरणीची कामे प्राधान्याने करून घेतील. मुसळधार पावसामुळे पालिकेला खड्डे भरता आले नाहीत तरी आता पावसाने उघडीप दिल्याने ही कामे प्राधान्याने करावीत, असे आ. भोईर यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक रवी पाटील, विद्याधर भोईर, छाया वाघमारे, प्रभुनाथ भोईर, हर्षदा थवील, मयूर पाटील उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Initiative of social organizations for pothole filling in dombivli kalyan amy