इंटरनेटवर प्रसिद्ध असलेल्या कुमारी आंटीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कुमारी आंटीचं चेहऱ्यावरील हास्य आता परतलं आहे. याचे श्रेय हैदराबादच्या मुख्यमंत्र्यांना जाते. वास्तविक, पोलिसांनी त्यांचा फूड स्टॉल बंद केला होता. यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत त्यांचे दुकान सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंटरनेटवर कुमारी आंटी म्हणून ओळखली जाणारी ही महिला हैदराबादमध्ये राईस, चिकन आणि मटणाचा स्टॉल चालवते. ती बऱ्याच वर्षांपासून याठिकाणी व्यवसाय करत आहे. त्यांच्या दुकानात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती खूपच कमी आहेत. इंटरनेटवर प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या स्टॉलला भेट दिली आहे. काही बातम्यांवर विश्वास ठेवला तर त्या लवकरच ‘बिग बॉस’च्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार अशी चर्चा रंगली आहे.

दुकान का बंद केले?

कुमारी आंटी ‘आयटीसी कोहिनूर’ च्या शेजारी ‘इनऑर्बिट मॉल’ समोर आपला स्ट्रीट फूड पॉइंट चालवतात. त्यांचा स्टॉल चांगलाच प्रसिद्ध झाल्यानंतर तिथे खवय्यांची गर्दी होऊ लागली. अनेक फूड ब्लॉगर्स आले आणि त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यांच्या लोकप्रियतेचा परिणाम वाहतुकीवर झाला. केबल पुलाजवळील रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करून ग्राहक त्यांच्या स्ट्रीट फूड स्टॉलवर येऊ लागले. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांचे दुकान बंद करून दुसरीकडे सुरू करण्याचे आदेश दिले होते.

(हे ही वाचा : कैद्यांना न्यायालयात नेत असताना वाटेतच पोलिसांच्या गाडीतील संपले इंधन; अन् मग काय घडलं, व्हिडिओ होतोय व्हायरल)

सेलिब्रिटींनी दिला पाठिंबा

कुमारी आंटीचे दुकान बंद झाल्याची बातमी आल्यानंतर काही लोकांनी हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले, तर अनेक लोक आंटीच्या समर्थनात आले. या वादाने टीव्ही अभिनेता संदीप किशनचे लक्ष वेधून घेतले. या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी आपली निराशा व्यक्त केली. त्यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये लिहिले, “हे अजिबात योग्य नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करून ती एकटी महिला अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरत आहे. अलीकडच्या काळातील महिला सक्षमीकरणाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणून तिच्याकडे पाहायला हवे. माझी टीम आणि मी त्या महिलेला शक्य होईल, त्या मार्गाने मदत करण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचत आहोत”, असे अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील रहिवासी असलेल्या कुमारी आणि त्यांचे कुटुंब गेल्या १३ वर्षांपासून हा स्टॉल चालवत आहेत. त्यांनी ऑफर केलेल्या करी आणि फ्रायचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दररोज दुपारी त्यांच्या स्टॉलला भेट देणाऱ्यांची गर्दी वाढत होती. ‘कुमारी आंटी’ रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर विविध प्रकारचे स्वादिष्ट मांसाहारी पदार्थ देतात. आंटीचे चिकण-मटण तिथल्या लोकांना खूप आवडते आणि त्यामुळे त्यांच्या स्टॉलबाहेर लांबच लांब रांग लागल्या असतात.

या प्रकरणी मुख्यमंत्री रेड्डी यांनी ३१ जानेवारी २०२४ रोजी पोलीस आणि पालिकेला स्टॉल हटविण्याबाबत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. कुमारी आंटीचा स्टॉल खुला राहील, असेही त्यांनी नव्या आदेशात म्हटले आहे. आता अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या स्टॉलला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री रेड्डीही त्यांच्या स्टॉलला भेट देऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why was the social media sensation kumari auntys street food stall closed down pdb