ठाकुर्ली येथील मध्य रेल्वेच्या बारा बंगला भागातील ६५ एकर जमिनीवरील २५० झाडे तोडण्याच्या प्रस्तावाची कल्याण डोंबिवली पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. बहुतेक सदस्यांनी या झाडांवर ‘घाव’ घालणारी भूमिका घेतली आहे. एकीकडे शासन वृक्षारोपण कार्यक्रम राबवून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे याच शासनाचे अंग असलेले महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन एकाच वेळी २५० झाडे तोडण्याचा घाट घालत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याच समितीने गेल्या वर्षी रेल्वेला ठाकुर्लीच्या जागेवरील ६३ झाडे तोडण्याची परवानगी दिली होती.
पालिकेच्या वृक्ष समितीने जागेवर जाऊन झाडांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर झाडांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पालिका आणि रेल्वेवर दबाव असल्यामुळे ते हे पाहणीचे ‘नाटक’ करीत असल्याचे बोलले जाते.
मध्य रेल्वेच्या २५० झाडे तोडण्याच्या कार्यक्रमाला परवानगी द्यायची की नाही याची सर्वस्वी जबाबदारी कल्याण डोंबिवली पालिकेतील वृक्ष प्राधिकरण समितीची आहे. कल्याण डोंबिवली शहरातील वाढते प्रदूषण पाहता या दोन्ही शहरांमधील मध्य रेल्वेचा ठाकुर्लीतील हा एकमेव हरितपट्टा वनराईने भरलेला राहावा, अशी भूमिका पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य घेतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. या समितीचे अध्यक्ष पालिकेचे आयुक्त असतात. काही वादग्रस्त विषय सभागृहात, समितीत असले की काही महत्त्वाच्या बैठका आयुक्तांना लागतात. त्यामुळे ते या महत्त्वाच्या विषयाच्या वेळी अन्य अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवतात. वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीच्या दिवशी आयुक्त उपस्थित नसल्याने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे सभापतिपदी बसले होते. राणे हे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजू सांभाळण्यात पटाईत असल्याने त्यांनी व समिती सदस्य शिवसेनेचे ‘धडाडी’चे नगरसेवक रवींद्र पाटील यांनी समितीच्या बैठकीत मध्य रेल्वे प्रशासनाला धारेवर धरण्याऐवजी झाडे तोडण्याच्या विरोधात भूमिका घेणारे चोळे ठाकुर्लीचे भाजपचे नगरसेवक श्रीकर चौधरी यांना धारेवर धरले.
‘ठाकुर्ली परिसरातील जमिनी या भूमिपुत्रांच्या आहेत. त्या विकासासाठी रेल्वेने कवडीमोलाने ताब्यात घेतल्या आहेत. या जमिनींवर झाडे तोडून मैदाने तयार करायची असतील तर रेल्वेने ती अन्यत्र करावीत. या भागातील झाडे तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करू नये. कोकणातून आलेल्या मंडळींना ते कसे कळणार, असा टोमणा चौधरी यांनी राणे यांना मारला. या विषयावरून राणे, पाटील विरुद्ध चौधरी यांच्यात बैठकीत शाब्दिक चकमक उडाली.
रेल्वे प्रशासनाला पालिकेच्या वृक्ष समितीने गेल्या वर्षी ६३ झाडे तोडण्याची परवानगी दिली होती. त्याच समितीने दुसऱ्याच वर्षी रेल्वेला २५० झाडे कशी तोडता याचा जाब विचारण्याऐवजी रेल्वे प्रशासनाची पाठराखण चालवली असल्याचे बोलले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुमताचा दबाव
या ठिकाणी असलेली झाडे तोडण्यास विरोध करण्याचा प्रयत्न आपण केला, पण समितीत आपल्या भूमिकेविरुद्ध इतर सर्व सदस्य एकवटले असल्याने आपणास बोलू देण्यात आले नाही. बोलण्याचा प्रयत्न केला तर रेटून विषय पुढे नेण्यात आला. त्यानंतर काही मंडळींना आपल्याविरोधात आपण बैठकीत गप्प बसलो असल्याच्या बातम्या पेरल्या, असे समिती सदस्य व नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी पालिकेचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

झाडे का तोडणार?
गेल्या वर्षी रेल्वे सुरक्षा दलाला कवायत मैदान तयार करण्यासाठी बारा बंगला भागातील ६३ झाडे रेल्वेने तोडली. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडे तोडण्यास परवानगी दिली. या वर्षी याच भागात रेल्वेला हॉकी, अ‍ॅथलेटिक्ससाठी मैदान तयार करायचे आहे. त्यासाठी २५० झाडे तोडण्याचा प्रस्ताव रेल्वेकडून पालिकेला पाठवण्यात आला आहे. बारा बंगला भागात शंभर वर्षांहून अधिक काळातील सुमारे एक हजारहून अधिक अवाढव्य वृक्ष या भागात आहेत. यामध्ये वड, आंबे, मोह, गुलमोहर अशा अनेक झाडांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree cutting in thane kalyan