पुढील सार्वत्रिक निवडणुका व्यक्तिकेंद्रित असतील आणि त्यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे सरचिणीस राहुल गांधी यांच्यात प्रमुख स्पर्धा असेल ही चर्चा केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी सपशेल फेटाळली. निवडणुका म्हणजे सौंदर्य स्पर्धा नव्हे, असे रमेश यांनी स्पष्ट केले.
भारतातील निवडणुका व्यक्तींमधील लढत म्हणून लढल्या जात नाहीत, निवडणुका म्हणजे राजकीय पक्षांमधील सौंदर्य स्पर्धा नव्हेत, असेही रमेश यांनी म्हटले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर राहण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता रमेश यांनी वरील मत व्यक्त केले.
निवडणुका ही क्षुल्लक बाब असू शकत नाही. अमेरिकेप्रमाणे आपल्याकडे पद्धत नाही, कारण आपल्याकडे निवडणुका राजकीय पक्षांच्या वतीने लढल्या जातात, व्यक्ती लढत नाहीत, असेही रमेश म्हणाले. निवडणुका नियोजित वेळेतच म्हणजे पुढील वर्षी मार्च अथवा एप्रिल महिन्यातच होतील. काँग्रेस स्वबळावरच निवडणुका लढेल. महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेशात आमची विविध पक्षांबरोबर युती आहे, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election means not a beauty contet ramesh