India shooters’ won Gold at Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने ५ पदके जिंकली होती पण त्यात एकही सुवर्णपदक मिळाले नाही. आता दुसऱ्या दिवशी भारताला सुवर्णाच्या रूपाने पहिले पदक मिळाले आहे. हे पदक १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत मिळाले आहे. दिव्यांश सिंग पनवार, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि रुद्रांक्ष पाटील या त्रिकुटाने देशासाठी हे सुवर्णपदक जिंकले. तीन राउंडपर्यंत भारतीय त्रिकुट तिसऱ्या क्रमांकावर होते आणि चीन आघाडीवर होता. मात्र, चौथ्या राउंडमध्ये भारताने दमदार पुनरागमन करत पहिले स्थान पटकावले. जे सहाव्या आणि शेवटच्या राउंडपर्यंत पहिल्याच क्रमांकावर होते.
नेमबाजी संघाने विश्वविक्रम केला
भारताला विश्वविक्रमासह आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. दिव्यांश सिंग पनवार, ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर आणि रुद्रांक्ष पाटील यांनी १८९३.७ गुण मिळवले. भारतीय त्रिकुटाने चीनचा विश्वविक्रम मोडला. गेल्या महिन्यात चीनने बाकूमध्ये १८९३.३ गुण मिळवले होते. आता विश्वविक्रम भारतीय नेमबाजांच्या नावावर आहे. या स्पर्धेत दक्षिण कोरियाने रौप्यपदक तर चीनने कांस्यपदक पटकावले.
शेतकऱ्याच्या पोराने केली सुवर्ण कामगिरी
सुवर्णपदक विजेता ऐश्वर्य तोमरचा जन्म ३ फेब्रुवारी २००१ रोजी मध्य प्रदेश राज्यातील खारगोन जिल्ह्यात रतनपूर गावात झाला. तीन भावंडांपैकी तो सर्वात लहान भाऊ आहे. ऐश्वर्य बऱ्याचदा त्याचे वडील वीर बहादूर यांच्याबरोबर शिकार करायला जात असे. चुलतभाऊ नवदीपसिंग राठौर यांच्याकडून त्याला नेमबाजी या खेळाबद्दल कळले. ऐश्वर्यने २०१५ साली भोपाळमध्ये मध्य प्रदेश शुटिंग अकादमीमध्ये वैभव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीच्या प्रशिक्षणाचा सराव सुरू केला. तोमरने २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले होते. आज अशी ऐतिहासिक कामगिरी करत त्याने भारताचा तिरंगा चीनमध्ये मानाने फडकवला.
नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर नौकानयन क्रीडा प्रकारात दोन कांस्यपदकं भारतीय खेळाडूंनी जिंकली. दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या नेमबाजांनी भारताला पहिले सुवर्णपद जिंकून दिले.
कोणी किती गुण मिळवले?
१९ वर्षीय रुद्रांक्ष पाटीलने भारतीय त्रिकुटात सर्वाधिक गुण मिळवले. तो जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदक विजेता आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. १९ वर्षीय रुद्रांक्षने ६३२.५ गुण मिळवले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या ऐश्वर्या प्रताप सिंगने ६३१.६ गुण आणि दिव्याश सिंग पनवारने ६२९.६ गुण मिळवले. दिव्याशने टोकियो २०२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.
वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत फक्त दोन
सांघिक सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच भारताचे केवळ दोन नेमबाज वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. रुद्राक्ष तिसरा, ऐश्वर्या पाचव्या आणि दिव्यांश आठव्या स्थानावर होते. टॉप-८ नेमबाजांना अंतिम फेरीत स्थान मिळते पण, एका देशाचे दोनच नेमबाज अंतिम फेरीत जाऊ शकतात. अशा परिस्थितीत दिव्यांशला बाहेर जावे लागले. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चीनचा शेंग लिहाओ वैयक्तिक स्पर्धेच्या पात्रतेमध्ये प्रथम राहिला. या स्पर्धेचा विश्वविक्रम धारक चीनचा यांग होरन २९व्या स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही.
मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games aishwarya rudransh and divyansh won indias first gold in asiad know everything about them avw