Jasprit Bumrah Statement on Retirement: जसप्रीत बुमराहची गणना जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. क्रिकेट जगतात त्याच्या यॉर्करची तोड नाहीय. यंदाच्या टी-२० विश्वचषक विजयात तो टीम इंडियासाठी सर्वात मोठा सामना विजेता खेळाडू ठरला. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मानेही त्याचे कौतुक केले आहे. भारतात परतल्यानंतर भारतीय खेळाडूंची दिमाखात विजयी परेड पार पडली आणि यानंतर वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांसोबत ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – VIDEO: आईचं प्रेम! विश्वविजेत्या लेकाला पाहताच मायेने कुरवाळलं, आजारी असतानाही लेकासाठी वानखेडेवर हजर

वानखेडेवर खेळाडूंनी नाचत आपल्या विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरूवात केली. ज्यात रोहित, विराट, सूर्यकुमार, हार्दिक पंड्या यासह सारेच खेळाडू नाचत होते. राष्ट्रगीत झाल्यानंतर काही खेळाडूंनी संवाद साधला. यादरम्यान विराट कोहलीने बुमराह हा जगातील आठवं आश्चर्य असल्याचे म्हटलं. यानंतर बुमराहने संवाद साधताना त्याच्या टी-२० मधील निवृत्तीवर मोठे वक्तव्य केले.

जसप्रीत बुमराह निवृत्तीबद्दल सांगताना म्हणाला की, “अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे. मी नुकतीच सुरुवात केली आहे. माझ्या निवृत्तीला अजून बराच वेळ आहे.” यानंतर पुढे बोलताना बुमराह म्हणाला, ” हे मैदान खरंच खूप खास आहे. मी लहान असताना इथे आलो होतो आणि आज मी जे पाहिलं, तसं मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं.”

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

“भारताने विश्वचषक जिंकल्यानंतरचा क्षण वेगळाच होता. मी सहसा भावुक होणारा नाहीय, पण माझ्या मुलाला पाहून मी सुध्दा भावुक झालो. मी सामन्यानंतर आजपर्यंत कधीच रडलो नाहीय, पण यावेळेस माझ्या डोळ्यात अश्रू होते. एकदा नाही, दोन तीन वेळा मी रडलो.” भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतरचा अनुभव सांगताना म्हणाला.

जसप्रीत बुमराहने २०२४ च्या टी२० विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज टिकू शकले नाहीत. यंदाच्या टी-२० विश्वतचषकात त्याने एकूण १५ विकेट घेतल्या. टी-२० विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज होता. बुमराहला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

हेही वाचा – विराट-रोहितचे पाय थिरकले अन् संपूर्ण टीम इंडियाने डान्स करत केलं भन्नाट सेलिब्रेशन; वानखेडेवरील व्हायरल VIDEO

भारतीय संघाने १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकली आहे. भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान, राहुल द्रविडचा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah statement on retirement while india t20 world cup victory parade says long way away bdg