दरवर्षीचे मुहूर्त, वेगवेगळ्या वेळा आणि बरीच माहिती सांगणारं पंचाग हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. दाते पंचांगाला या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात सांस्कृतिक-सामाजिक-आर्थिक जडणघडणीमध्ये पंचांगाचे महत्त्व व मार्गदर्शन मोलाचे असते. महाराष्ट्रात तरी पंचांग म्हणजे दाते पंचांग असे समीकरण झालेले आहे. तेच दाते पंचांग येणाऱ्या वर्षी शंभराव्या वर्षांत पदार्पण करीत आहे.
इसवी सन १९०६ मध्ये लोकमान्य टिळक यांनी ज्योतिष परिषदेत ‘पंचांग हा आकाशाचा आरसा आहे. पंचांगातील गणित आकाशात दिसले पाहिजे,’ असे वक्तव्य केले होते. त्या काळी पंचांगामध्ये एकवाक्यता नव्हती. मतभिन्नता होती. गणित एकच असताना फरक का या जिज्ञासेपोटी लक्ष्मण गोपाळ ऊर्फ नाना दाते यांनी पंचांगाचे गणित तयार करून शके १८३८ म्हणजे इ. स. १९१६-१७ या वर्षीचे पहिले दाते पंचांग प्रसिद्ध केले.

त्यानंतर १९४६-४७ पासून धुंडीराजशास्त्री दाते तथा अण्णा हे पंचांगाच्या कामी पूर्णपणे मदत करू लागले. त्यांनी धर्मशास्त्रीय शंकासमाधान, घडय़ाळाच्या वेळेप्रमाणे वेळा इ. खूप सुधारणा केल्या. परिणामी भारत सरकारने कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर त्यांना घेतले, तसेच राष्ट्रीय पंचांगाच्या मराठी आवृत्तीचे कामही दाते पंचांगाकडे आले.
पंचांगाचे कामात अण्णांना त्यांचे लहान भाऊ श्रीधरपंतांचे मोलाचे साहाय्य होते. कालचक्राच्या ओघात मधली पिढी काळाआड गेली, पण दाते पंचांग प्रकाशित होणे थांबले नाही. अण्णांचे चिरंजीव अनंत तथा मोहनराव यांनी ती जबाबदारी समर्थपणे सांभाळली. श्रीधरपंतांचे चिरंजीव विनय यांचाही त्यात तेवढाच वाटा राहिला आहे. मोहनरावांनीही त्यात अनेक चांगले प्रयोग केले.  नवी  पिढीही आपल्या आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेशी अतूट राहावी म्हणून चौथ्या पिढीच्या ओंकारकडून केले जाणारे नवे प्रयोगही वाखाणण्यासारखे आहेत. या तिघांनीही वेबसाइटच्या माध्यमातून दाते पंचांग संगणक युगात नेले आहे. दाते पंचांग वेबसाइट, संहिता हे कुंडलीचे सॉफ्टवेअर तसेच एसएमएस तसेच मोबाइल अ‍ॅप्लिकेशन अशा माध्यमातून नव्या संगणक युगाची गरज भागविली जाते आहे.
आज कॅलेंडरच्या युगात पंचांगाची संस्कृती टिकविण्याचे कार्य दाते पंचांग परंपरेने करीत आहे. इंग्रजी तारखांचे कॅलेंडर जरी असले तरी त्या कॅलेंडरमध्ये दिलेले सण, व्रत, उत्सव, सूर्योदयास्त, चंद्रोदय याची माहिती पंचांग गणिताशिवाय देता येत नाही. कारण कालगणना व कालनिर्देश करणे हे पंचांगाचे प्रमुख कार्य आहे.
पाच अंगांनी युक्त असे ते पंचांग तिथी-वार-नक्षत्र-योग-करण ही पाच अंगे कालनिर्देश करतात. सूर्य व चंद्र यांच्या गतीमुळे ही पाच अंगे निर्माण होतात. त्यावरून मुहूर्ताचे शुभाशुभ काळ ठरविता येतात. कोणतेही कार्य करताना मुहूर्त पाहण्याची आपली भारतीयांची परंपरा आहे. त्यासाठी पंचांगाचा उपयोग मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्याशिवाय कुलाचाराची माहिती, उपयुक्त शास्त्रार्थ, शंका-समाधान, व्रत-वैकल्यांसंबंधी माहिती, पावसाचे भविष्य, अशी बरीच माहिती पंचांगात दिलेली असल्याने सर्व क्षेत्रांतील जिज्ञासूंना पंचांगाचा उपयोग होत असतो. दाते पंचांग हा मराठी सारस्वताचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा आहे. दरवर्षीच्या माघ- फाल्गुन महिन्यांत न चुकता दाते पंचांग खरेदी करणारे व चत्री पाडव्याला श्रद्धेने पूजा करणारे सुमारे पाच लाख कुटुंबे आहेत. त्या सगळ्यांची ही गरज दाते कुटुंबीय पुरवीत आहेत.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Date panchang a journey of century