स्थापना : १८९३ उत्सवी वर्ष : शतकोत्तर बाविसावे
पुण्यातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवानंतर, समाजाच्या विविध घटकांत उत्सवाचा मोठा प्रसार झाला. १८९३ साली महत्त्वाच्या मंडळांची सुरुवात झाली त्यापैकी राजाराम रघुनाथ लोंढार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेले त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळ हे एक म्हणावे लागेल. साऱ्या प्रथा, परंपरा सांभाळत, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अनेक सामाजिक उपक्रमांत आघाडी घेत आज हे मंडळ १२२ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. मंडळाने १२१ वर्षांपूर्वी शमीच्या लाकडापासून तयार केलेली गणपतीची शोभिवंत, कलात्मक व तेजस्वी मूर्ती आजदेखील जतन केली आहे. शताब्दी उत्सवात काका वडके यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने मोठी भरारी घेतली. हा शताब्दी सोहळा तब्बल सहा महिने सुरू होता. सध्या मंडळाची धुरा अध्यक्ष उन्मेश निजामपूरकर यांच्यावर आहे.
मंडळाच्या मिरवणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या मिरवणुकीचे संपूर्ण संयोजन हे महिलांमार्फत केले जाते. पथकांची जागा, क्रम या सर्वाची आखणी महिलाच करतात. मिरवणुकीदरम्यान
१९११ साली स्थापन झालेले वाचनमंदिर हा मंडळाचा सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे. एका छोटय़ाशा खोलीतून सुरू झालेले हे वाचनालय तीन मजली इमारतीत सुरू असून, ४० हजार पुस्तके असून, १७५० सभासद आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषके देऊन प्रोत्साहन दिले जाते. शैक्षणिक शिबिरे, रक्तदान शिबिरे, किल्ले स्पर्धा, गिरिभ्रमण, लहान मुलांची निवासी शिबिरे असे उपक्रम नियमित घेतले जातात.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम मंडळातर्फे राबविले जातात. गुढीपाडवा, चैत्रगौरी हळदी कुंकू, गुरुपौर्णिमा, नागपंचमी असे वर्षभरातील सारेच सण समारंभ एकत्रितपणे आणि उत्साहात साजरे केले जातात.
गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून केले जाणारे विविध उपक्रम आणि त्या अनुषंगाने अनेक संस्थादेखील कार्यरत झाल्या आहेत. महाकालिका नागरी सहकारी पतसंस्था, महिला बचत गट, नामसप्ताह सोहळा, वधुवर सूचक मंडळ, विश्वकर्मा क्रीडा संघ, लग्न कार्यालय, देऊळ, वारकऱ्यांना जेवण व राहण्याची सोय, एकवीरादेवी भक्तांगण सेवा मंडळ हे सारे उपक्रम याचीच साक्ष देतात.