दिव्यांग कल्याण अभियानांतर्गत आज धुळे येथे आयोजित एका कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. बच्चू कडू म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे दिव्यांग कल्याण मंत्रालयाची मागणी केली होती. परंतु, ती मान्य झाली नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ते होतंय. आम्ही गुवाहाटीला जाऊन बदनाम झालो खरे, परंतु, त्या बदल्यात आम्हाला दिव्यांग कल्याण मंत्रालय मिळालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बच्चू कडू म्हणाले, दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करा अशी मागणी मी राज्य सरकारकडे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. मी आधीच्या सरकारमध्ये होतो. राज्यमंत्री असताना आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत होत्या. परंतु, दिव्यांग मंत्रालयाची मागणी पूर्ण होत नव्हती. ही मागणी मान्य करायला कोणी तयार नव्हतं. मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली. मी त्यांना म्हणालो, दिव्यांग मंत्रालय बनवा, हा बच्चू कडू तुमचा गुलाम बनून राहिलं. परंतु, तेव्हा हे मंत्रालय झालं नाही.

हे ही वाचा >> “तुझं टमरेलच वाजवतो”, पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटलांचा संताप; म्हणाले, “जातीवंत तरुणांनी…”

आमदार बच्चू कडू म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रत्येक ठिकाणी हा विषय मांडला आहे. दिव्यांगांसाठी भांडलो आहे. आज सोन्याचे दिवस येत आहेत. आपलं दिव्यांग मंत्रालय हे देशातलं पहिलं मंत्रालय असणार आहे. सगळे आमदार गुवाहाटीला गेले त्या काळात मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे फोन आले. मी त्यांना म्हटलं, मी तुमच्याबरोबर येतो. तुम्ही दिव्यांग मंत्रालय देत असाल तर मी तुमच्याबरोबर येईन. त्या काळात आम्ही बदनाम झालो. परंतु, त्याबदल्यात आपल्याला काय मिळालं? दिव्यांग मंत्रालय मिळणार आहे. सामान्य माणसाचं मंत्रालय पहिल्यांदा होतंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu seeking for divyang kalyan mantralaya uddhav thackeray asc