Maharashtra Political Dispute : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं, तो निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी उद्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी निकाल जाहीर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावरून आता दोन्ही गटातील आमदारांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला. “कसलीही धाकधूक नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री अनैतिक आणि असंवैधानिक आहेत. इतके महिने थांबलो, आता २४ तास थांबा सगळं चित्र स्पष्ट होईल”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा >> मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी उद्याच निकाल येणार, माहिती देत स्वतः सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले…

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी

गेल्यावर्षी जून महिन्यात राज्यात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्यसभेची मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे २५ आमदारांसह सुरतला रवाना झाले. त्यावेळेस शिवसेनेत पडलेल्या ठिणगीची माहिती अवघ्या महाराष्ट्राला मिळाली. त्यानंतर एका पाठोपाठ एक महाराष्ट्राच्या राजकारणात अनाकलनीय घटना घडू लागल्या. ठाकरेंच्या गटात असणारे अनेक आमदार हळूहळू शिंदेंच्या गटात सामिल झाले. त्यामुळे शिंदे गटाला बळ मिळाले. या बळाच्या जोरावर त्यांनी भाजपासोबत हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्रफडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर, राज्याचे दोन दिवसीय विशेष विधिमंडळ अधिवेशन बोलावण्यात आले. यावेळी रिक्त असलेले विधानसभेचे अध्यक्ष पद राहुल नार्वेकरांना देण्यात आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडली. या बहुमत चाचणीत शिंदे फडणवीस सरकारला यश मिळाल्याने त्यांचे सरकार अबाधित राहिले.

एकनाथ शिंदे यांच्या या बंडाला आणि महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाला सर्वोच्च न्यायालायत आव्हान देण्यात आले. १६ आमदार अपात्र ठरवण्यात यावे अशीही याचिका यावेळी करण्यात आली होती. याप्रकरणी उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे १६ आमदार अपात्र ठरतात का? की विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालय नकार देतंय याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाला उद्या ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis result supreme court tomorrow aditya thackeray says sgk