दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांनी आज मातोश्री या ठिकाणी येऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, उद्धव ठाकरे त्यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे तेदेखील वाघच आहेत असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मातोश्रीवर या दोन नेत्यांची भेट झाली. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरेंना न्याय देईल अशी अपेक्षा आहे असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे अरविंद केजरीवाल यांनी?

मागील काही दिवसांत जो घटनाक्रम घडला आहे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली आहे, त्यांचया पक्षाचं चिन्ह चोरीला गेलं, त्यांच्या पक्षाचं नाव चोरीला गेलं, त्यांचं जे काही होतं, ते सगळं चोरी करून नेलं, पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते. उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र यांच्याबरोबर आहे हा मला विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून यांना संपूर्ण न्याय मिळेल अशी आशा मला आहे. येत्या प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भरगोस यश मिळेल, असं मला वाटतंय असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

आम आदमी पार्टीशी युती होणार का?

या भेटीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

भाजपाला गुंडगिरीशिवाय काही येत नाही

भाजपाला गुंडगिरीशिवाय काही येत नाही, यामुळे देश पुढे जाणार नाही. दिल्लीतील जनतेनं आम्हाला बहुमत दिलं, तरीही दिल्लीत महापौर बसवायला आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं असं केजरीवाल म्हणाले. या देशात एकच पक्ष आहे जो २४ तास निवडणुकीबद्दल विचार करतो असं सांगत केजरीवाल यांनी भाजपाला टोला लगावला. आम्ही देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर विचार करतो असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.

करोना काळात उद्धव ठाकरेंचं काम कौतुकास्पद

करोना काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारे काम केलं ते कौतुकास्पद आहे. करोना काळात महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक कामांची दिल्लीमध्ये आम्ही अंमलबजावणी केली असं अरविंद केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले की, आज लोकांना नोकऱ्या नाहीत, युवक बेरोजगार आहेत, याचवेळी देशातील महागाई वाढत आहे. एलआयसीसारखी कंपनी तोट्यात जोत आहे. देशातील काही उद्योगपतींना फायदा करुन देण्यासाठी केंद्र सरकार देशाला विकायला निघालं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra will stand with uddhav thackeray said delhi cm arvind kejrival scj