गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पडत असलेला पाऊस जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून आणखी जोर धरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईसह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार बरसल्यानंतर आता विदर्भ आणि मराठवाडय़ात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडय़ासह उर्वरित राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. रविवारी कोकण विभागासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून पावसाची हजेरी आहे. विशेषत: दुष्काळी भागामध्ये पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील धरण क्षेत्रातही पावसाची हजेरी असल्याने पाणीसाठय़ात हळूहळू वाढ होत आहे. मुंबई आणि पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही चार दिवसांपासून पाणीसाठा जमा होतो आहे. रविवारी मुंबई, सांताक्रुझ, अलिबाग, रत्नागिरीत पावसाने हजेरी लावली. अलिबागमध्ये पावसाचा जोर चांगला होता. मध्य महाराष्ट्रात पुण्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सातारा, सांगलीतही पाऊस बरसला. मराठवाडय़ातही तुरळक ठिकाणी पाऊस होता.

विदर्भात अतिवृष्टीचा इशारा : हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ आणि २ जुलै रोजी विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या दिवशी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक पावसाची शक्यता आहे. ३ जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon in maharashtra