सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांकडून गंभीर आरोपही करण्यात येत आहेत. त्याचेच पडसाद राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटल्याचं गुरुवारी पाहायला मिळालं. ठाकरे गटाचे आमदार व माजी मंत्री अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर तपास यंत्रणांच्या चौकशीवरून आगपाखड केली. तसेच, ‘सगळा हिशोब इथेच होतो’ असंही अनिल परब विधानपरिषदेत म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला आत टाका, पण कुटुंबाला…”

अनिल परब यांची ईडीकडून चौकशी चालू असताना आपल्या कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचं अनिल परब यावेळी म्हणाले. “जे लोक सोन्याचा चमचा घेऊन राजकारणात आलेत, त्यांचं ठीक आहे. आपण रस्त्यावर मारामारी करून, भानगडी करून, आंदोलन करून, पोलिसांचा मार खाऊन इथे आलोय. माझ्या बाबतीत काही हरकत नाही. आम्हाला उचला, टाका आत. पण कुटुंबाला भोगायला लावू नका”, असं अनिल परब म्हणाले.

दरम्यान, विरोधी बाकांवरून कुणीतरी प्रसाद लाड यांचा उल्लेख करताच अनिल परब यांनी त्यांना टोला लगावला. “लाडांकडे सोन्याचा नाही, प्लॅटिनमचा चमचा आहे. तो चमचा सगळ्या भांड्यांमध्ये चालतो. कोणत्याही पक्षाचं भांडं असू देत. त्यांचा चमचा चालतो”, असं परब यांनी म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.

“राष्ट्रवादीचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे”, प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“सगळा हिशेब इथेच होणार”

यावेळी बोलताना अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. “आज तुम्ही म्हणाल जशास तसं. आज आमचं कुटुंब भोगतंय. पण तुमच्या कुटुंबाला असंच भोगायला लागू नये अशी मी इश्वरचरणी प्रार्थना करतो. कुटुंबाला भोगायला लावू नका. तुमचेही मुलं-मुली शाळेत जातायत. त्यांना जेव्हा पोलीस स्टेशनला बोलवून चार चार तास बसवून ठेवलं जाईल, तेव्हा तुम्हाला कळेल त्याचं काय असतं ते. पोलीस आल्यानंतर माझ्या मुलीला विचारतात तुझा बाप कुठे बसलाय? एक लक्षात ठेवा, जशास तसं असतं, इथेच त्याचा हिशेब होऊ शकतो”, असं अनिल परब म्हणाले.

मुंबई पालिका निवडणुकांवरून टीकास्र

दरम्यान, सत्ताधाऱ्यांना मुंबई महानगर पालिका निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्याचं परब यावेळी म्हणाले. “मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होत नाहीयेत. या दीड वर्षांत मुंबई महानगर पालिकेत प्रशासन काम करत आहे. असं सांगतायत की मविआचं सरकार कोर्टात गेल्यामुळे पालिकेच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकत नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाने मविआचा निर्णय योग्य ठरवला आहे. २३६ वॉर्डमध्ये निवडणुका घेतल्या तर आपला पराभव होऊ शकतो अशी भीती कदाचित सरकारला वाटली असेल. त्यामुळेच कायद्यात दुरुस्ती करून पुन्हा २२७ वॉर्ड केले”, अशा शब्दांत अनिल परब यांनी सरकारवर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction anil parab slams government in monsoon session pmw