लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकार लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. अभिनेत्री यामी गौतम पाठोपाठ आता बॉलिवूडमधील दिग्दर्शक, अभिनेता आनंद तिवारीने अभिनेत्री अंगिरा धरशी लग्न केले आहे. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे. आनंद आणि अंगिराने जवळपास दोन महिन्यांपूर्वी, ३० एप्रिल रोजी गुपचूप लग्न केले आहे.
आनंद तिवारीने शुक्रवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने ‘३० एप्रिल रोजी मी आणि अंगिराने लग्न केले आहे. काही मोजक्याच लोकांना लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते. कुटुंबीय, जवळचे मित्र यांचा आशिर्वाद घेऊन आम्ही नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी आनंदच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा : अखेर ५५ दिवसांनंतर अनिरुद्ध देवेला मिळाला डिस्चार्ज, केली करोनावर मात
अंगिरा धरने देखील लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान तिने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये अंगिरा अतिशय सुंदर दिसत आहे. आनंद आणि अंगिराने लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताच अनेक बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनन्या पांडे, आयुषमान खुराना, कोकणा सेन शर्मा, मिताली पालकर, अदा शर्मा, नेहा धूपिया आणि इतर काही कलाकारांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
आनंद तिवारी आणि अंगिरा धरने एका ओटीटी चित्रटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह पर स्क्वेअर फुट’ आहे. आनंदने ‘गो गोवा गॉन’, ‘आयशा’, ‘उडान’ आणि ‘छपाक’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्याने ‘बंदिश बँडिट्स’ या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.