बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच कंगना रणौत. कंगना नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असो अथवा राज्यातील राजकारण. एखाद्या विषयावर मत मांडण्याची संधी कंगना कधीही सोडत नाही. कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘थलायवी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. फक्त भारतात नव्हे तर जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट सोशल मीडियावरही ट्रेंड होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्येही हा चित्रपट ट्रेंड असल्याचे बोललं जात आहे.
कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट पाकिस्तानमध्ये वाईट अर्थाने ट्रेंड केला जात आहे. या चित्रपटाचा पाकिस्तानमधील अनेकांनी निषेध केला आहे. हा चित्रपट वाईट असल्याचे अनेक पाकिस्तानी लोकांचे म्हणणे आहे. काल रविवारपासून पाकिस्तानात ट्वीटरवर ‘थलायवी’ चित्रपटाचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर पाकिस्तानातील नेटफ्लिक्सच्या टॉप 10 चित्रपटांची यादी शेअर केली. यात ‘थलायवी’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ठरलं! करीना नाही तर कंगना साकारणार सीतेची भूमिका
कंगनाने याचे काही स्क्रीनशॉट इन्स्टावर शेअर केले आहेत. “हसण्याखेळण्यात एक गोष्ट ऐकून फार दिलासा मिळाली की, देशद्रोही हे फक्त याच देशात नाही,” असे तिने म्हटले. ‘थलायवी’ या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत हिने जयललिता यांची भूमिका साकारली आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी एम.जी.रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ए.एल.विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून शैलेश सिंग आणि विष्णू इंदुरी निर्माते आहेत. जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट काल प्रदर्शित करण्यात आला. आता कंगना लवकरच ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
आणखी वाचा – कंगना रनौत – योगी आदित्यनाथ भेट; उत्तर प्रदेशच्या ODOP मोहिमेची झाली ब्रँड अॅम्बेसेडर!
कंगनाच्या ‘तेजस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबर महिन्यापासून सुरूवात केली होती. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’नंतर सर्वेश मेवारा यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट असणार आहे. यात सैन्य दलाच्या साहसाची कथा मांडली जाणार आहे. या चित्रपटात एका महिला वैमानिकेच्या साहसाची कहाणी दाखवण्यात आली आहे. २०१६ साली पहिल्यांदाच भारतीय विमान चालवण्यासाठी एका महिलेची नियुक्ती केली होती. तिच्याच जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.